नारायणगाव -लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या वीजग्राहकांना केवळ सुलभ हप्त्यात बिले भरण्याची परवानगी पुरेशी नाही. महावितरणने पाठविलेल्या वाढीव बिलात तत्काळ सुधारणा करावी, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
करोनाचे संकट रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यातील वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महावितरणने ग्राहकांना वीज वापराची बिले पाठवताना प्रचलित स्लॅबनुसार वीजआकारणी केली आहे.
त्यामुळे ग्राहकांना वाढीव दराचा भुर्दंड पडत असल्याची तक्रार केली जात आहे. आधी भरलेल्या सरासरी बिलांचे समायोजन केले नसल्याने बिलाची रक्कम वाढल्याचीही तक्रार नागरिक करीत आहेत. यासंदर्भात महावितरणकडे ग्राहकांनी विचारणा केल्यावर पुढच्या बिलात सुधारणा करू, असे सांगितले जाते.
यातून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. याकडे डॉ. कोल्हे यांनी ऊर्जामंत्री राऊत यांचे लक्ष वेधले आहे. केवळ हप्त्याने बिल भरण्याची सवलत देणे पुरेसे नसून वाढीव दराचा भुर्दंड सोसावा लागू नये, यासाठी सुधारित बिले देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली आहे.