भवानीनगर -करोनाच्या काळात साध्या पद्धतीने लग्न समारंभ करण्यात येत आहेत. यातून अनावश्यक खर्चाला फाटा बसत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. परंतू नवरी मुलीच्या बापांची कर्जाच्या बोजामधून काही केल्या सुटका होताना दिसून येत आहे. लग्न जरी साधे भोळे केले जात असले, तरी वाचलेल्या खर्चाच्या बदल्यात सोन्याच्या तोळ्यांमध्ये मात्र मोठी वाढ होताना दिसून येत आहे. याचा खर्च नवरी मुलींच्या वडिलांना सोसावा लागत आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याने सर्व व्यवसायामध्ये मंदीचे सावट मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहे. सध्याच्या काळात सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने या काळात वाजत गाजत लग्न करण्यापेक्षा अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याची पद्धत सगळीकडे निर्माण झाली आहे. सनई चौघडा, वाजंत्री, घोडा, हलगीवाले, तुतारीवाले, गजरेवाले, मंडपवाले, कार्यालय सुशोभीत करणारे या सर्वांना बगल देत आर्थिक अडचणीत मार्ग काढत लग्न समारंभ करण्याचे सत्र सध्या सर्वत्र सुरू आहे. परंतु याची दुसरी बाजू म्हणजे हा वरील सर्व खर्च टाळला जात असला तरीदेखील या खर्चाच्या बदल्यात सोन्याच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे.
दोन तोळे देऊन लग्न करून देणाऱ्या नवरी मुलीच्या बापाला सध्या दोन ऐवजी सहा ते दहा तोळ्यांची खरेदी करावी लागत आहे. लॉकडाउनच्या काळात आणि करोना सारख्या रोगाच्या भीतीने जास्त प्रमाणात नागरिक एकत्र न येण्याचे शासनाने निर्णय घेतला असला तरीदेखील काही प्रमाणात का होईना शासनाने लग्न समारंभ करण्यात परवानगी दिलेली आहे. मात्र थोडक्या माणसात जरी लग्नकार्य होत असले तरीदेखील सध्या सराफ बाजारांमध्ये नागरिकांची सोने खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे.
थोडक्या खर्चात लग्न पार पडले…
करोनाच्या नावाखाली लग्न जरी कमी माणसांमध्ये व कमी खर्चामध्ये उरकले जात आहेत. या सर्व खरेदीची जागा फक्त एकाच सोन्याने घेतल्याने या अगोदर जेवढा लग्नसमारंभासाठी खर्च येत होता. तेवढाच खर्च आजही नवरी मुलीच्या बापाला करावा लागत आहे.सध्याच्या लग्नसराईत खर्चाला कात्री हा जो शब्द आहे याला पूर्णपणे बगल दिली जात असून हा शब्द फक्त नावापुरताच उरला आहे. जो काही पाहिजे तो खर्च गाजावाजा न करता केला जात आहे. परंतु हा सर्व खर्च होऊन देखील सध्याच्या काळात अगदी थोडक्या खर्चात लग्न पार पडले हा शब्द मात्र प्रचलित झाला आहे.