नवी दिल्ली: अम्फान वादळाने आता उग्र रूप धारण केले असून ते बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात पोहोचले आहे. येत्या दोन दिवसांत ते पश्चिम बंगालमधल्या दिघा आणि सुंदरबन भागातून पार होईल. यावेळी ताशी 165 ते 185 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या वादळामुळे आंध्र प्रदेशाच्या अमरावती तसेच उत्तर समुद्र किनारपट्टी भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये पूर्व मेदिनीपूर, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा, हावडा, हुबळी आणि कोलकाता या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम जगतसिंगपूर, केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोरसह उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांवरही होण्याची शक्यता आहे.
समुद्रामध्ये 4-5 मीटर उंचीच्या वादळी लाटांचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे, ज्यामुळे दक्षिण आणि उत्तर 24 परगण्यातील किनारपट्टीचा सखल भाग जलमय होईल तर पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात 3-4 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळ धडकण्याच्या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात उपाययोजना केल्या जाव्यात आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.
सर्व संबंधितांना वीज, दूरसंचार यासारख्या अत्यावश्यक सेवेची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यांच्या तयारीचा वेळेत आढावा घेऊन कोणताही अडथळा आल्यास सेवा त्वरित पुन्हा सुरू करण्याची सूचना केली आहे.
भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने मदत व बचावकार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. या राज्यांतील लष्कर आणि हवाई दलाच्या तुकड्यांनाही सज्ज राहायला सांगितले आहे. एनडीआरएफने ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 25 तुकड्या तैनात केल्या आहेत. याव्यतिरिक्त 12 तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या तुकड्या बोटी, ट्री कटर, टेलिकॉम उपकरणे इत्यादी आवश्यक सामग्रीनी सुसज्ज आहेत.
दरम्यान, या वादळाला तोंड देण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने आपल्या 25 तुकड्या बचावकार्यासाठी या भागात पाठवल्या असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.