मंचर -मुंबई, पुणे आणि इतर भागांतून आंबेगाव तालुक्यात गेल्या चार दिवसांत सुमारे 3 हजार नागरिकांनी प्रवेश केला आहे. ही संख्या प्रशासनाकडे नोंद झालेल्या नागरिकांची असून रात्रीच्या वेळी अंधारात येणारे अजून समोर आलेले नाहीत. तालुक्यात एक दिवसात सुमारे साडेसातशे नागरिक दाखल झाल्याची माहिती आंबेगाव तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. या नागरिकांमध्ये मुंबईकरांची संख्या मोठी असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
करोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासन रात्रंदिवस झटून काम करीत आहे. गावपातळीवर प्रत्येक गावातील सरपंचांनी, ग्रामस्थांनी एकत्र येऊन खबरदारीचे उपाय म्हणून गावांमध्ये विविध उपाययोजना अंमलात आणल्या असल्या तरी काही गावांनी मात्र गावपातळीवर प्रशासन ढिम्म असल्याचे दिसून येते. गावपातळीवर सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली. प्रत्येक गावातील ग्रामस्थांनीही यासाठी प्रशासनाला चांगले सहकार्य दाखवले होते.
लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र बंद असल्यामुळे अनेक व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. आमचे कितीही आर्थिक नुकसान झाले तरी आम्ही ते सहन करू; मात्र नागरिकांचा करोनाचा आपल्या गावात रुग्ण सापडू नये म्हणून जीव वाचला पाहिजे. रस्त्यावरील वाहतूक खुली झाल्याने तालुक्यात कोण कधी कोठून येतोय याचा कोणालाही तपास लागत नाही. अनेक नागरिक शहरातून आलेल्या व्यक्तींची माहिती लपवत आहेत. ही बाब भूषणावह नाही, अशी खंत मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी व्यक्त केली.
कधी गावाचे तोंड न पाहणारेही आले
आंबेगाव तालुक्यात प्रामुख्याने चारही सीमाभागांतील गावांमध्ये मुंबई येथून ग्रामस्थ आलेले आहेत. ग्रामीण भागातील ज्या नागरिकांनी अनेक वर्षे गावचे तोंड पाहिले नव्हते तेसुद्धा आता गावाकडे दाखल झाले आहेत. प्रत्येक गावात पुणे आणि मुंबईकरांची वाढती संख्या ही करोनाचा धोक्याचा इशारा देत असल्याचे बोलले जात आहे. पुणे-मुंबईकरांच्या या वाढत्या संख्येमुळे गावातील ग्रामस्थ, सरपंच, प्रशासनाकडे तक्रार करीत असतात. या नागरिकांना शासनाने परवानगी दिल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे.
लॉकडाऊन शिथिल करू नका, कडक करा
आंबेगाव तालुक्यात इतर शहरांतून येणाऱ्यां नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासन हतबल झाले आहे. तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ, सरपंच, पोलीस प्रशासन करोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवताना गेल्या दोन महिन्यांपासून डोळ्यात तेल घालून काम करीत होते. मात्र, शासनाने शहरवासीयाना गावाकडे जाण्याची परवानगी देताच शहरातील नागरिकांचा गावाकडे लोंढा वाढल्याने सर्वजण चिंतेत सापडले आहे. त्यासाठी लॉकडाऊन शिथिल न करता कडक करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वैद्यकीय चाचणी न करताच गावात रात्रीच्या वेळी
स्वतःच्या खासगी गाडीतून आले आहे. भावकीत वाद नको म्हणून त्यांची माहिती स्थानिक लोक आरोग्य कर्मचाऱ्यांपासून लपवत आहे. स्थानिक व्यक्तींना करोनाची बाधा होऊ शकतो. तेव्हा बाहेर गावाहून आलेल्या नवीन व्यक्तींची माहिती “आशा’ कर्मचारी, सरपंच, स्थानिक पोलीसपाटील यांना त्वरित देऊन त्या व्यक्तींना होमक्वॉरंटाइन करण्यात यावे किंवा काही अडचण असल्यास त्यांनी मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क करून कळवावे.
– कृष्णदेव खराडे, निरीक्षक, मंचर पोलीस ठाणे