नवी दिल्ली: अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या व कमी पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या अटल पेन्शन या योजनेला गेल्या पाच वर्षात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या कालावधीत 2 कोटी 20 लाख कर्मचाऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला.
ही योजना 9 मे 2015 रोजी असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी सुरू करण्यात आली होती. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया पीएफआरडीए या संस्थेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, पहिल्या दोन वर्षात 50 लाख कामगारांनी याचा लाभ घेतला. तर तिसऱ्या वर्षी ही संख्या दुप्पट होऊन एक काटीे झाली. चौथ्या वर्षी ही संख्या दीड कोटी झाली तर गेल्या वर्षी 70 लाख कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे आगामी काळात ही योजना आणखी यशस्वी होऊन जवळजवळ सर्व कामगार या योजनेचा लाभ घेऊन आपले जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतील असे या संस्थेने म्हटले आहे.
असंघटीत क्षेत्रातील कामगारांना साठ वर्षानंतर थोडाफार आर्थिक आधार मिळावा याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा महिला चांगला फायदा घेत आहेत. शंभर पैकी 57 पुरुष आणि 43 महिला या योजनेचा लाभ घेतात असे आकडेवारीवरून दिसून येते.