नवी दिल्ली: एकीकडे कर्मचारी घरातून काम करण्याचा प्रयत्न करीत असतानाच सायबर हल्लेखोर ह्या काळात सक्रीय झाले असून करोनाव्हायरस संबंधातील मुद्द्याचा वापर करून गेल्या तीन महिन्याच्या काळात 9,100 एवढे सायबर अटॅक झाल्याची माहिती पुढे आली आहे.
यासंदर्भात मायक्रोसॉफ्ट कंपनीने पाहणी केली असता असे आढळून आले की, 2 फेब्रुवारी ते 2 मे दरम्यान हल्लेखोरांनी सायबर हल्ले करून एक तर माहीती काढून घेण्याचा प्रयत्न केला किंवा खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. आशिया खंडात या कालावधीत 19 दशलक्ष सायबर अटॅक झाले. त्या तुलनेत भारतातील परिस्थिती चांगली आहे. मात्र गाफील राहून चालणार नाही. कंपनी आणि कर्मचाऱ्यांनी माहिती तंत्रज्ञान यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगण्यात आले.
सायबर हल्लेखोरांनी अगोदर कंपन्यांच्या एका भागावर हल्ला करतात. त्यानंतर इतर विभागावर हल्ले करण्याच्या शक्यता पडताळून पुढील हल्ले केल्याचे दिसून आले. याकरिता सायबर हल्लेखोर करोनाव्हायरस संदर्भातील उपचाराचे आमिष दाखवतात. एका हल्ल्यानुसार जे लोक पुढील लिंक लवकर क्लिक करतील त्यातील पहिल्या 1000 जणांना कोरोनाव्हायरस ची लस उपलब्ध करण्यात येईल असे सांगितले जाते. लस आपल्याला लवकर मिळावी म्हणून घरातून काम करीत असलेले कर्मचारी आपल्या सहकार्याची चर्चा न करता त्या लिंक वर क्लिक करतात आणि हल्ला होतो. असे अनेक प्रकार यासंबंधात आढळून आले आहेत असे सांगण्यात आले.