शेवगाव -लॉकडाऊनच्या शिथीलतेनंतर आता राज्यात व राज्याबाहेर इतरत्र गेलेल्यांनाही आपापल्या घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शेवगाव तालुक्यातील 42 गावात 278 जण अन्य जिल्ह्यातून आले आहेत. त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांचे संबंधित गावच्या शाळांमध्ये चौदा दिवसासाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.
मात्र हा आकडा रोज वाढतो आहे. त्यांच्या जेवणाची सोयही बहूतेक संबंधित ग्रामपंचायत करत आहे. तर शेवगाव शहरातील क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना येथील माहेश्वरी मंडळाच्या वतीने रोज जेवणाचे डबे पुरविले जात आहेत. आरोग्य तपासणीसाठी आयुर्वेद डॉक्टर असलेल्या 31 समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्ती करण्यात आली असून हे आरोग्य अधिकारी आलेल्याची तपासणी करत आहेत. तालुक्यातील 113 गावापैकी 71 गावात एकही जण बाहेरून आलेले नाही.
तर आखेगावात सर्वाधिक 78, भातकुडगावला 16, कांबीला 12, बोधेगावला 11, दहेगावनेला 8 तर वरुर बुद्रुक, वडुले बुद्रुक, ताजनापुर व सोनविहिर येथे सर्वात कमी प्रत्येकी एकेक जण क्वारंटाईन करण्यात आले.शेवगावातील हॉटेल मंगेशमध्ये 4, लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात 25, अजिंक्य लॉन्समध्ये 20, हॉटेल साई पुजामध्ये 5 जणांना ठेवण्यात आले आहे.