वाघळवाडी – सोमेश्वर सहकारी कारखान्याचा गळीत हंगाम संपला असून ऊसतोडणी कामगारांना गावाकडे पाठवण्याची कारखान्याची तयारी सुरू झाली आहे. शुक्रवार (दि. 1) पर्यंत त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्यांना त्यांच्या गावी पाठविले जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. आज दिवसभर तपासणी झालेले ऊसतोडणी कामगार शुक्रवारपासून गावाकडे परतणार आहेत.
करोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर ऊसतोडणी कामगारांना त्यांच्या गावाकडे पोहोचवण्याची जबाबदारी शासनाने संबंधीत साखर कारखान्यांवर सोपविली आहे. यानुसार गेल्या एक महिन्यापासून सोमेश्वर कारखान्याने 4 हजार ऊसतोडणी कामगारांना 32 लाखांच्या आसपास किराणा माल तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक यादव म्हणाले की, सोमेश्वर कारखान्यावर असलेल्या एकूण चार हजार कुटुंबाची आरोग्य तपासणी गुरुवार (दि. 30) पासून सुरू झाली असून सोमेश्वर कारखाना मेडिकल स्टाफ तसेच बारामती आरोग्य विभागातील असे मिळून 3 डॉक्टर आणि 10 आरोग्य सेवक मिळून ही तपासणी करत आहेत. जवळपास 10 हजार 300 च्या आसपास कामगारांची संख्या असल्याने तपासणी ला कालावधी लागत आहे.
राजेंद्र यादव म्हणाले, सोमेश्वर कारखान्यावर ऊसतोडणी कामगारांची एकूण 4 हजार कुटुंबाची मिळून 10 हजार 300 ऊसतोडणी कामगारांची संख्या आहे. तर जनावरांची 8 हजार 500 अशी आहे. यांना सुखरूप गावी पोहोचविण्यासाठी कारखान्याने 600 ट्रक टेंपोची तयारी केली आहे. ऊसतोडणी कामगार, जनावरे आणि वाहनांची यादी साखर आयुक्तांना ऑनलाइन पाठविली असून सोमेश्वर कारखान्यावर राज्यातील 13 जिल्ह्यातून 29 तालुक्यातून 425 गावातील हे सगळे ऊसतोडणी कामगार आहेत. साखर आयुक्त ही याद जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार असून जिल्हाधिकारी ही यादी 13 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहेत. प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्हा निहाय या याद्या बनवण्यात आल्या आहेत.