कोपरगाव : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा आठवड्यातून तीनच दिवस सुरू असल्याने आज नागरिकांनी शहरातील मुख्य रस्त्यासह संभाजी चौक ,धारणगाव रोड ,निवारा कॉर्नर परिसर आदी भागात मोठी गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग नियमाचा फज्जा उडाला . तर काही भागांमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांना मास्क लावा.
थुंकू नका, लांबून खरेदी करा असे सांगत होते. मात्र, नागरिक कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे आज शहरामध्ये दिसून आले. तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र, प्रशासनाने शेजारील तालुक्यामध्ये हॉटस्पॉट झाल्याने खबरदारी घेऊन तालुक्याच्या सीमा बंद केल्या आहेत.
तालुक्याच्या सीमेवर पोलिस व महसूलप्रसाशनातर्फे कडक नजर ठेवण्यात येत आहे. येवला, मालेगाव ,संगमनेर या भागातून कोणीही नागरिक कोपरगाव तालुक्यामध्ये येणार नाही याची खबरदारी प्रशासन घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तालुक्यातून ये-जा करणाऱ्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी असे आवाहनही केले आहे. शहरात आज दोन दिवसानंतर अत्यावश्यक सेवा सुरू होती. मात्र, शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी एकच गर्दी केल्याने प्रशासन हतबल झाले.
किराणा दुकानांमध्ये तर सर्वाधिक गर्दी दिसून आली .शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या एका किराणा दुकानात ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी सदरची गर्दी करावी कमी करावी म्हणून सूचना केल्या. मात्र, गर्दी वाढतच गेल्याने अखेर सदर किराणा दुकान बंद करण्यात आले. मुख्य रस्त्यावर देखील नागरिकांनी भाजी बाजार व इतर साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी शासकीय नियमाची ऐशी की तैशी केली.