मुंबई : राज्यात आतापर्यंत 96 पोलिसांना करोनाची बाधा झाली असून त्यातील सात जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान वारंवार आवाहन करूनही रस्त्यावर फिरणाऱ्या 15 हजार जणांना कोठडीची हवा खावी लागली आहे. तर या काळात 69 हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांच्या वतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आली.
करोनामुळे जारी केलेल्या लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या 14 हजार 955 लोकांना अटक करण्यात आली असून या काळात सुमारे 69 हजार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याच काळात 47 हजार 158 वाहने जप्त करण्यात आली असून पोलिसांवर हल्ले करणाऱ्या 400 जणांना अटक करण्यात आली आहे, असे यात म्हटले आहे. एकूण 69 हजार 374 गुन्हे भारतीय दंड संहितेच्या कलम 188चे उल्लंघन केल्याबद्दल दाखल करण्यात आले आहेत. तर पोलिसांवर हात उचलणाऱ्या 477 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सायंकाळी जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यात बाधितांची संख्या सहा हजार 817वर पोहोचली असून 301 जण मरण पावले आहेत. गेल्या 24 तासांत 394 नवे बाधित तर 18 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यातील चार हजार 589 बाधित एकट्या मुंबईत आहेत. केंद्राचा इशारा येत्या काही दिवसांत देशाच्या आर्थिक राजधानीत येत्या काही दिवसांत संसर्गात वेगाने वाढ होण्याची भीती केंद्रीय पथकाने व्यक्त केली आहे. मात्र या इशाऱ्याने घाबरण्याची गरज नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.