नवी दिल्ली – जागतिक करोना महासंकटाच्या पृष्ठभूमीवर पुढील महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) वार्षिक बैठकीनंतर डब्ल्यूएचओ मुख्यालयाचे नेतृत्व भारताकडे येणार आहे, अशी विश्वसनीय माहिती डब्ल्यूएचओशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी एका इंग्रजी दैनिकाला दिली आहे.
चीनच्या वुहानमध्ये उगम पावलेल्या करोना व्हायरसने जगाला विळखा घालण्याआधीच हा निर्णय घेण्यात आला होता.
डब्ल्यूएचओमधील रिक्त जागा भरण्यासाठी कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची औपचारिक निवड 18 मे रोजी जागतिक आरोग्य अधिवेशनात प्रस्तावित आहे. डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल टेड्रोस अधनोम यांच्या संबोधनाने अधिवेशाची सुरुवात होणार आहे. त्यांचे संबोधन करोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यावर अधिक केंद्रित राहील. या अधिवेशनानंतर भारताच्या डब्ल्यूएचओ अध्यक्षपदासोबतच कार्यकारी मंडळाच्या इतर सदस्यांची औपचारिक निवड केली जाणार आहे.
जगातील संयुक्त राष्ट्र संघाची एजन्सी, संसर्गजन्य कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संघर्ष करीत असताना डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदासाठी भारताच्या उमेदवाराची नियुक्ती होईल. या उमेदवाराच्या घोषणेकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. आज जगभरात करोनामुळे 1 लाख 80 हजार लोक मृत्युमुखी पडले, तर अडीच लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
जागतिक आरोग्य असेंब्ली परिषदेनंतर कार्यकारी मंडळाच्या पहिल्या बैठकीत 22 मे रोजी भारत डब्ल्यूएचओ मध्ये नेतृत्वाचे स्थान स्वीकारेल. कारण याच दिवशी जपान आपल्या अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल व त्यानंतर त्या जागी भारताची निवड घेईल, अशी माहिती दिल्ली व जिनेव्हामधील राजनयिकांनी दिली.
डब्ल्यूएचओच्या अध्यक्षपदाची सूत्रे भारताकडे येण्याचे गतवर्षी ठरविण्यात आले होते, तेव्हा डब्ल्यूएचओच्या दक्षिण पूर्व आशिया गटाने सर्वानुमते तीन वर्षांच्या कार्यकारी मंडळाकडे नवी दिल्लीचे नाव प्रस्तावित केले होते. या प्रादेशिक गटाने एका वर्षाच्या रोटेशनद्वारे अध्यक्षपदासाठीही भारताला नामांकन दिले.