शुक्रवारी आडते, कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद
पुणे-पंतप्रधान नरेंद मोदी यांनी रविवारी (22 मार्च) “जनता कर्फ्यु’चे आवाहन केल्याने मार्केटयार्डातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय आडते आणि कामगार संघटनांनी घेतला आहे, असे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, करोनामुळे मार्केटयार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन आणि कामगार संघटनांनी फळे, भाजीपाला विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी बाजार आवारातील सर्व व्यवहार बंद होते. शनिवारी (21 मार्च) सात्पाहिक सुट्टीमुळे कामकाज बंद राहणार आहे. फुल बाजारातील आडत्यांनीही यापूर्वीच रविवारपर्यंत बंद पाळला आहे. भुसार बाजार रविवारी बंद असतो. सलग तीन दिवस बाजार बंद राहणार असल्याने सोमवारी (23 मार्च) फळभाज्यांची मोठी आवक होण्याची शक्यता आहे.
फळभाज्यांची आवक तशी चांगली आहे. किरकोळ व्यापाऱ्यांनी फळभाज्यांची आधीच खरेदी करून ठेवली आहे. तसेच पुरंदर, हवेली तालुक्यांतील शेतकरी परस्पर शहरातील छोट्या बाजारात शेतीमाल विक्रीसाठी पाठवितात. त्यामुळे शहरात पुढील तीन दिवस फळभाज्यांची टंचाई निर्माण होणार नाही. दरम्यान, बाजार आवारातील घटकांची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीस श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल तसेच पदाधिकारी उपस्थित होते. भुसार बाजाराचे कामकाज नियमित सुरू आहे. फळे, भाजीपाला बाजार बंद आहे.
मांजरी, मोशी, खडकीतील उपबाजाराचे कामकाज सुरू आहे. दोन दिवस फळभाजी बाजार बंद असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी यापूर्वी फळभाज्यांची खरेदी करून ठेवली आहे. बाजार बंद ठेवल्याने पुढील दोन दिवसांत औषध फवारणी तसेच स्वच्छतेचे काम करण्यात येईल. सोमवारी बाजाराचे कामकाज नियमित सुरू होईल. यापुढील काळात किरकोळ विक्रेत्यांनी कमीत कमी गर्दी करून जास्तीत जास्त शेतीमालाची खरेदी करावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी केले.