मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विरोधकांचे फोन टॅप प्रकरणी दोन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून, सहा आठवड्यांत समिती सविस्तर अहवाल गृह विभागाला सादर करणार आहे.
या समितीमध्ये अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग आणि सहआयुक्त (गुप्तचर) अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी समिती नेमण्यात यावा असे पत्र गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार याना गृहमंत्र्यांकडून मिळाले आहे. ते म्हणाले सोमवारी सकाळी गृहमंत्र्यांचे पत्र आंम्हाला मिळाले असून हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप सध्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकारचे कोणतेही आदेश गृह विभागाला दिले नसल्याचे आगोदरच त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावर राज्यात बराच गदारोळ झाला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विरोधकांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ठाकरे सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.