हेक्टरी 25 हजार देण्याची मागणी; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
पंचनाम्यांची तहसीलदरांना माहिती नाही
दगडू सपकाळ यांनी कुसुंबी येथे शेताची पाहणी केल्यानंतर नुकसान भरपाईबाबत तहसीलदारांना फोन केला असता, कुसुबी येथील पंचनामे झाले की नाही, ते माहिती नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले. तहसीलदारांनाच पंचनाम्यांबाबत माहिती नसेल तर शेतकऱ्यांनी दाद कोणाकडे मागायची, असा सवाल सपकाळ यांनी केला.
मेढा – जावळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग, घेवडा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करून हेक्टरी 25 हजार रुपये सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार दगडू सपकाळ यांनी केली.
मेढा, ता. जावळी येथे शासकीय विश्रामगृहावर नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जावळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने केवळ भात पिकाचे पंचनामे न करता सर्व पिकांचे पंचनामे करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यात स्वतः लक्ष घालून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देणे गरजेचे आहे. याबाबत शिवसेनेने याही आधी निवेदन दिले असले तरी तहसीलदार त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या, असा आदेश सरकारने काढला असतानाही जावळी तालुक्यात तहसीलदार, तलाठी शेतीकडे फिरकले नाहीत. या गोष्टीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सपकाळ यांनी केली. यावेळी शिवसेनेचे जावळी-सातारा विधानसभा क्षेत्रप्रमुख एस. एस. पार्टे, एकनाथ ओंबळे, तालुकाप्रमुख विश्वनाथ धनवडे, मेढा शहरप्रमुख सचिन जवळ, विद्यार्थी सेनाप्रमुख सचिन करंजेकर उपस्थित होते.