श्वेतपत्रिका जाहीर करावी – जयंत पाटील
मुंबई : समाज माध्यमांमध्ये हेरगिरीचा प्रकार सुरु आहे. इस्त्रायलमधील एनोसो कंपनीमार्फत देशातील काही लोकांची माहिती काढली गेली आहे. हा प्रकार भारतात घडतोय ही चिंतेची बाब असून “स्नुपिंग’ प्रकरणी सरकारने “एसआयटी’ स्थापन करावी आणि सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. फेसबुकने 40 लोकांची नावे उघड केली आहे. त्यामध्ये 14 लोक महाराष्ट्रातील आहेत. ही मर्यादीत यादी आहे. यापेक्षा जास्त माहिती असू शकते. पाळत ठेवण्याचे काम सुरू आहे. फेसबुकने याअगोदर उघड केली होती. याची माहिती केंद्रसरकारला मे महिन्यापासून होती. केंद्र सरकारला नावे कळवली आहेत तर ती प्रसारीत करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. स्नुपिंगसाठी सॉफ्टवेअरकरीता 5 लाख डॉलर व 70 हजार डॉलर खर्च केला गेला असून हा खर्च भारतातल्या कुठल्या कंपनीने केला, केंद्र सरकारने कुणाला मान्यता दिली, कुणाच्या आदेशाने पाळत ठेवण्यात आली, अस प्रश्न उपस्थित करीत जयंत पाटील यांनी याची माहिती समोर आली पाहिजे अशी जोरदार मागणी केली.
महाराष्ट्रात दलित नेत्यांवर पाळत ठेवण्यात आली का, माहितीच्या आधारावर त्यांना नक्षलवादी ठरवण्यात आले का, कुणावर त्यातून मुद्दाम कारवाई करण्यात आली का याबाबतची माहिती पुढे येत आहे, असे सांगतानाच यापूर्वी उद्योगपतींना मदत म्हणून पूर्वी पाळत ठेवली जात होती. पण आता जे घडत आहे हे प्रकरण गंभीर असून व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. हे अतिक्रमण सरकार करत आहे अशी शंका येत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
जगात अशा घटना घडल्या त्यावेळी सरकार पडले होते. राजीव गांधी यांच्या घराबाहेर पोलिस पाळत ठेवले. पाळत ठेवणे हे भारतात कधीही सहन केले नाही. ही जबाबदारी केंद्राची आहे. केंद्र सरकारने ही जबाबदारी टाळू नये, असे ठणकावून सांगतानाच याबाबत केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तात्काळ खुलासा करावा, मागणीही जयंत पाटील यांनी केली.