देवस्थानच्या विकासासाठी “सोनाई परिवार’चा हातभार : वारकऱ्यांची वर्दळ
रेडा – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावापासून हाकेच्या अंतरावर व तब्बल पाच गावांच्या सीमेवर वसलेले तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी या देवतांच्या मूर्ती स्वयंभू असलेले क्षेत्र विठ्ठलवाडी धाकटे पंढरपूर येथील देवस्थानमध्ये विकासाचे मॉडेल म्हणून नावारूपास येत आहे. अखंड विना भजन, कीर्तन, हरिपाठ, काकडा, अन्नदान आधी धार्मिक उपक्रम गेल्या 38 वर्षांपासून सुरू असल्याने पुणे व सोलापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांना धाकटे पंढरपूर अध्यात्माचा ठेवा ठरत आहे. देवस्थानच्या विकासासाठी सोनाई परिवाराचा हातभार मिळाला आहे.
इंदापूर तालुक्यातील डिकसळ गावचे ज्योतीराम मामा जाधव हे वारकरी पंथातील होते. दरमहा पंढरीची वारी करीत होते. वयाने थकल्यावर पंढरपूरची वारी ज्योतीराम मामा यांना करता नव्हती. म्हणून त्यांनी विठूरायाकडे धावा केला की, विठुराया मला एकादशी वारीला येता येत नाही. शेवटची वारी करताना ज्योतिराम मामा यांना असा दृष्टांत झाला की, पायी घरी जाताना मागे बघू नका. ज्योतीराम मामांनी क्षेत्र पंढरपूरपासून पायी चालत असताना कोठेही मागे बघितले नाही. त्यांनी आजचे असणारे धाकटे पंढरपूर विठ्ठलवाडी येथे आल्यावर मागे पाहिले. तर साक्षात विठ्ठल- रुक्मिणी मागे चालत येत होते. मागे बघताच विठ्ठल व रुक्मिणी हे दोघेही याच ठिकाणी गुप्त झाले. तेव्हापासून या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभे राहिले, अशी आख्यायिका आहे.
जिल्ह्यातील भाविकांची वर्षभर मांदियाळी
विठ्ठलवाडी धाकटे पंढरपूर हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. याच परिसराभोवती वन विभागाचे क्षेत्र आहे. वन्य प्राणी, हरीण, ससे, मोर व इतर पशु- पक्षी वावरतात. पूर्वी या ठिकाणी ओसाड माळरान होते. काझड येथील ह.भ.प गोसावी महाराज यांनी येथील विठ्ठल मंदिरात कीर्तन सुरू केले, यावेळी किर्तन सेवेसाठी ह भ प श्रीरंग माने (बापू), डोईफोडे गुरुजी, आण्णासाहेब खारतोडे, गावकऱ्यांनी साथ दिली. गोसावी महाराज यांना मंदिरामध्ये अखंड विना सुरू करण्याचा मानस होता. त्यांनी सवंगड्यांना घेऊन अखंड नामस्मरण व विना सुरू केला. तब्बल 38 वर्षांपासून आजही सुरूच आहे. याठिकाणी वृद्ध मंडळी व परिसरातील वारकरी मंडळी दररोज मुक्कामी असतात. त्यांना अन्नदान, कपडे व मानधन व इतर सुविधा विठ्ठल-रुक्मिणी सेवाभावी ट्रस्ट रुई या विश्वस्त मंडळाच्या वतीने पुरवण्यात येतात.
या ट्रस्टमध्ये 17 विश्वस्त आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष हरिश्चंद्र श्रीरंग माने यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार चालत आहे. याठिकाणी अल्पदरामध्ये विवाह सोहळा व्हावा, यासाठी अद्ययावत मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे. बारमाही हे मंगल कार्यालय धार्मिक, कौटुंबिक कार्यासाठी गजबजलेले असते.याच कार्यालयामार्फत मिळणारा निधी धार्मिक कार्यासाठी खर्च करण्यात येतो. रोज मंदिरात सकाळी काकडा, दुपारी भजन, संध्याकाळी हरिपाठ व प्रत्येक एकादशीवेळी किर्तन, असे धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात. याच ठिकाणी अन्नदान करण्यात येते. हजारो वारकरी भक्तगण दर्शनासाठी सातत्याने येत असल्यामुळे धाकटे पंढरपूर म्हणून या भागाचा नावलौकिक
वाढला आहे.
सुविधा देण्यासाठी प्रवीण माने यांचा भर –
मंदिर परिसरातच मारुती मंदिर, ह.भ.प गोसावी महाराज मंदिर निर्माण करण्यात आले आहे. सोनाई परिवाराच्या माध्यमातून अद्ययावत भक्तनिवास, स्वागत कमान तसेच दरवर्षी भजन स्पर्धा इतर सुखसुविधा देवस्थानच्या विकासासाठी सोनाई परिवाराच्या माध्यमातून मिळण्यासाठी मोठा हातभार लागत आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने यांच्या माध्यमातून जवळपास 65 बाय 45 इतका मोठा सभामंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुख्य मंदिराला येण्यासाठी रस्ता, पाण्यासाठी अद्ययावत टाकी आदी अनेक लहान, मोठी विकासकामे सभापती माने यांच्या माध्यमातून होत आहेत. वारकऱ्यांना रोजचे जेवण तयार करून देण्यासाठी 27 वर्षांपासून जगन्नाथ महाराज खारतोडे व त्यांच्या पत्नी विनामोबदला सेवा म्हणून काम करीत आहेत. देवस्थानला पर्यटन स्थळाचा वरिष्ठ दर्जा मिळण्यासाठी सभापती प्रवीण माने पाठपुरावा करीत आहेत.