सोलापूर : अण्णाभाऊ साठे आर्थिक मंडळ गैरव्यवहारप्रकरणी गेली तीन वर्षे तुरुंगात असलेले सोलापूरमधील मोहोळ मतदारसंघाचे आमदार रमेश कदम यांना तीन दिवसांचा जामीन मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी न्यायालयाने कदम यांना तीन दिवसांचा जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर आर्थर रोड तुरुंगातून सुटून कदम गुरुवारी मोहोळमध्ये दाखल झाले. यावेळी कदम यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कदम उद्या (04 ऑक्टोबर) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील.
आमदार रमेश कदम यांच्या स्वागतासाठी मोहोळमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तसेच त्यांच्यासाठी 500 किलो वजनाचा फुलांचा हारदेखील तयार करण्यात आला आहे. तीन ते सहा ऑक्टोबर पर्यंत उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
रमेश कदम हे 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र अण्णाभाऊ साठे आर्थिक मंडळ गैरव्यवहारप्रकरणी ते गेल्या 40 महिन्याहून अधिक काळ हे तुरुंगात आहे. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता यावा यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मंजूर करत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर केल्यानंतर रमेश कदम हे पहिल्यांदाच मोहोळमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी 500 किलोचा हार आणला असून क्रेनद्वारे रमेश कदम यांना तो घालण्यात येणार आहे. हजारोंच्या संख्येने सकाळपासूनच कार्यकर्ते मोहोळमध्ये जमायला सुरुवात झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडतर्फ आमदार रमेश कदम यांना “ईडी’ कोर्टाकडून याआधीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यांच्याविरोधात सीआयडीने दाखल केलेले प्रकरण प्रलंबित असल्याने कदम हे तुरुंगातच होते. त्यासाठी यांनी हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती.