प्रशांत जाधव
राजू शेट्टी; “आमचं ठरलंय’च्या उमेदवाराला पुरस्कृत करण्याची शक्यता
सातारा – माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबत रोज चर्चा होत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या मतदारसंघावर सोमवारी दावा सांगितला. मात्र, स्वाभिमानीकडून थेट उमेदवार न देता “आमचं ठरलंय’ या जयकुमार गोरेविरोधी आघाडीतील उमेदवाराला पुरस्कृत केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात राजकीय भूकंप होऊ शकतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून माण मतदारसंघावर दावा सांगितल्याची माहिती स्वत: राजू शेट्टी यांनीच दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.
गेले अनेक दिवस सतत काही तरी वेगळे घडत असल्याने माण मतदारसंघात जिल्ह्यात चर्चेत आहे. जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असतानाच गोरेंना भाजपमधूनच विरोध होऊ लागला. त्यानंतर त्यांविरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. त्यांची “आमचं ठरलंय’ ही आघाडी राज्यभरात चर्चेत आली असताना, स्वाभिमानीने या मतदारसंघावर दावा केल्याने राजकीय घडामोडींकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
स्वाभिमानीचे प्रदेश प्रवक्ते अनिल पवार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, हा मतदारसंघ आमच्या वाट्याला आल्यास आम्ही विरोधी पक्षांमध्ये सर्वमान्य असलेला उमेदवार उभा करू. “आमचं ठरलंय’च्या उमेदवारालाही त्यांची इच्छा असल्यास पुरस्कृत करू. या मतदारसंघातून जयकुमार गोरेंना हद्दपार करण्याचे “आमचं ठरलंय’ टीमचे ध्येय आहे, तेच स्वाभिमानीचेही आहे. त्यांनी स्वाभिमानीच्या तिकिटावर लढावे अथवा आम्ही त्यांना पुरस्कृत करू.
स्वाभिमानीच्या दाव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित रहात आहेत. “आमचं ठरलंय’ टीमने घोषित केलेले उमेदवार अनिल देसाई हे स्वाभिमानीचा प्रस्ताव मान्य करणार का? या टीमने नकार दिल्यास स्वाभिमानी कोणता उमेदवार देणार? राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणती भूमिका घेणार, या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. मात्र, माण मतदारसंघात माजी आमदार जयकुमार गोरे, अनिल देसाई, शेखर गोरे, संदीप मांडवे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यास चौरंगी किंवा पंचरंगी लढतीची शक्यता आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आमची आघाडी आहे. माण मतदारसंघ आम्ही राष्ट्रवादीकडून मागितला आहे. आ. जयंत पाटील यांनीही त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. “आमचं ठरलंय’ टीमसोबतही आमची चर्चा सुरू आहे. त्यांचा ठरलेला उमेदवार हा स्वाभिमानी पुरस्कृत करण्यासाठी अनिल पवार यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.