उड्डाणपुलाच हवा होता; नागरिकांची मागणी
दौंड – कुरकुंभ मोरीच्या घाणीपासून दौंडकरांचा बचाव व्हावा याकरिता उड्डाणपुलाची नागरिकांतून मागणी होत होती. परंतु, या भागाच्या खासदारांकडून पुन्हा दौंडकरांच्या माथी तिसरी मोरी (रेल्वेचे गटर) मारण्यात आली. याचेच काम सध्या संथगतीने सुरू आहे. येथे घेण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने दुर्गंधीसह डासांची पैदासही वाढली आहे, हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी दौंडकरांची अपेक्षा आहे.
रेल्वे हद्दीतून वाहत येणारे सांडपाणी कुरकुंभ मोरी लगतच्या एसटी थांब्यावर तसेच कुरकुंभ मोरीतून वाहत असते यामुळे प्रवासी, शालेय विद्यार्थी तसेच शहरातील नागरिकांना याचा सतत उपद्रव सहन करावा लागत असल्याने तिसऱ्या मोरीचे काम करण्यात येत आहे. याच ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी होती. परंतु, दौंडकरांना पुन्हा मोरीतूनच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.
या मोरीलगत असलेल्या एसटी थांबा येथून सत्र न्यायालय, प्रांत ऑफिस तसेच विविध शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी दौंड-बारामती-दौंड असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस या संख्येत वाढच होत आहे. ही बाब लक्षात घेऊन दौंड एसटी आगाराच्यावतीने प्रत्येक तासाला एसटी सोडण्यात येते. शहरातील कुरकुंभ मोरी येथील रेल्वे हद्दीत एसटी बस थांबा आहे.
या थांब्याचीही सध्या दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे प्रवासी हवालदिल झाले आहेत. थांब्याच्या शेजारीच रिक्षा स्टॅंड असल्यामुळे एसटीच्या चालकाला गाडी चालविताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या, गौरी-गणपतीचा सण असल्याने कुरकुंभ मोरीतील गटारींचीही तातडीने व्यवस्था करून या सणांचे महत्त्व लक्षात घेऊन कुरकुंभ गटारीचे पाणी बंद करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.