शिक्रापूर येथे भूमिपूजनाला पालकमंत्र्यांची दांडी
शिक्रापूर- शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील पुणे- नगर महामार्गावर शिक्रापूर ते वाघोली रस्त्याच्या सहापदरीकरण कामाचा शुभारंभ आज आयोजित केला असताना तब्बल चारशे पंधरा कोटींच्या कामाच्या उद्घाटनालाच उद्घाटक असलेले मंत्र्यांनी दांडी मारली. त्यामुळे 415 कोटी रुपयांच्या कामांच्या शुभारंभाचा फज्जा उडाला आहे. दरम्यान, शिक्रापूर ते वाघोली रस्त्याच्या सहापदरीकरण कामाचा फलक लावून शुभारंभ आयोजित केला. परंतु रस्त्याचे सहापदरीकरण होत असताना रस्त्याच्या कडेला असलेली जागा वर्ग करून घेणे गरजेचे आहे. मात्र, कोणत्याही जागा मालकांना त्याबाबत नोटीस देखील आली नाही. कोणत्याही जागा मालकांना याबाबत माहिती नाही.
शिक्रापूर येथील नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हायब्रीड ऍम्युनिटी योजनेतून चारशे पंधरा कोटी निधीतून होणाऱ्या शिक्रापूर ते वाघोली रस्त्याच्या सहा पदरीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर कामगार व पुनर्वसनमंत्री संजय भेगडे व राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. परंतु भूमिपूजन करण्यासाठी शिक्रापूर येथील मुख्य चौकातील चाकण चौक येथील जागा निवडण्यात आली. यावेळी शिक्रापूर मुख्य चौकामध्ये असलेल्या चांगल्या डांबरी रस्त्यावरच सत्ताधाऱ्यांकडून मुरूम टाकून भूमिपूजन करण्याचे आयोजन केले.
सकाळी अचानकपणे कामाच्या शुभारंभबाबतचा फलक आणून चाकण चौकात लावला. त्यानंतर कार्यक्रमाची वेळ सकाळी अकराची असतानाच बाराच्या दरम्यान पालकमंत्री पाटील हे उपस्थित राहणार नसून कामगार व पुनर्वसनमंत्री संजय भेगडे यांचे देखील येण्याबाबत निश्चित नसल्याची बातमी परिसरात पसरली. त्यामुळे भूमिपूजनाबाबत चर्चा रंगू लागली. त्यांनतर चारच्या सुमारास अखेर मंत्री भेगडे, आमदार बाबुराव पाचर्णे व काही कार्यकर्ते चाकण चौकात दाखल झाले. यावेळी शुभारंभाच्या फलकाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी हे काम कोणत्या योजनेतून तसेच कोणत्या तत्वावर आणि कोणत्या स्वरूपात केले जाणार, याबाबत माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर मंत्री भेगडे व आमदार पाचर्णे हे कामाबाबत एक न बोलता सर्वजण पुढील कार्यक्रमांसाठी निघून गेले.
- निवडणुका जवळ आल्याने विकासकामांचे गाजर – अशोक पवार.
माजी आमदार अशोक पवार म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना यापूर्वी पाच वर्षे विकासकामे सुचली नाहीत. पाच वर्षे सध्याचे आमदार हे रस्त्याने गैरसोय होत असल्यामुळे बीओटी रस्त्याचा वापर करीत होते. लोकांनी कोणत्या रस्त्याने जायचे, सध्या निवडणुका जवळ आल्यामुळे जनतेला विकासकामांचे गाजर दाखविण्याचे काम सध्या सुरू आहे.