वरळे ते महाळुंगे इंगळे रस्त्याच्या मंजूर निधीवरून सोशल मीडियावर श्रेय घेण्याचा प्रयत्न
जिल्हा प्रतिनिधी
पुणे- वरळे ते महाळुंगे इंगळे रस्त्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून 7 कोटी 47 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. मात्र, या मंजुर निधीवरून आता सत्तेतील शिवसेना-भाजप पक्षांमध्ये चांगलाच श्रेयवाद रंगला आहे. भाजप, शिवसेनचे समर्थक आपल्याच नेत्यामुळे हा निधी मंजूर झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर झळकवले आहे.
तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग 50 ते बिरदवडी ते आंबेठाण ते महाळुंगे इंगळे, आंबेठाण ते महाळुंगे इंगळे व वराळे ते महाळुंगे इंगळे या 3 महत्त्वाच्या रस्त्यांचे सर्वेक्षण पीएमआरडी च्या माध्यमातून झाले होते. यापैकी पुणे-नाशिक रस्ता ते बिरदवडी महाळुंगे इंगळे रस्ता 12 कोटी 40 लाख रुपये खर्च करून पीएमआरडीएकडून सुरू असून या मार्चअखेर या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, वराळे ते महाळुंगे इंगळे रस्त्यासाठी 7 कोटी 47 लाख रुपये मंजुर केल्याचे जिल्हा परिषदे भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांचे म्हणणे असून तसे वृत्तपत्रातील प्रसिद्ध बातम्याचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर झळकत आहे.
आमदार सुरेश गोरे यांच्या प्रयत्नातून वराळे ते महाळुंगे रस्त्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातून तब्बल 7 कोटी 77 लाख रुपये मंजूर करून घेतले आहे, असे पोस्टर सध्या सोशल मीडियावर झळकत आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच केवळ मंजुर निधीवरून सत्तेतील शिवसेना-भाजप यांच्यात श्रेयवाद सुरू झाल्याने निवडणुकीसाठी सगळे “माफ’ असते अशी चर्चा सध्या रंगली आहे. तर ऐन निवडणुकीत दोन्ही पक्षांनी विरोधी पक्षांना टीका करण्याचे आयते कोलीतच दिले असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
- नक्की कोणाचे प्रयत्न?
तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट की आमदार सुरेश गोरे यापैकी कोणाच्या प्रयत्नामुळे हा निधी मंजुर झाला आहे? असा सवाल आता सर्वसामन्य जनतेला पडला आहे. तर रस्ता केव्हा पूर्ण हाईल हे दोन्ही नेत्यांच्या पोस्टरमध्ये उल्लेख नसल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर केवळ सामन्य नागरिकांच्या “डोळ्यात धुळफेक’तर केली नाही ना असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. तर सत्तेतील दोन्ही पक्ष मंजुर निधीवरून श्रेयवाद घेत आहेत. तर मग काम पूर्ण झाल्यावर हे काय करणार? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. - नागरिकांच्या कोपरखळी
निधी मंजूरचे श्रेय घेण्यापेक्षा पहिले रस्ता दर्जेदार आणि त्वरीत पूर्ण करा मग कोणाला श्रेय घ्यायचे ते घ्या. पण हा निधी जो मंजुर झाला आहे, तो नागरिकांनी भरलेल्या टॅक्सच्या रकमेतून होत असल्याची “कोपळखळी’ ही नागरिक लगावत आहेत.