निमसाखर – नीरा खोऱ्यामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे वीर धरणातून 70 हजार क्युसेकने पाणी जलसंपदा विभागाने सोडले आहे. खात्याने मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे या परिसरात पाऊस नसतानाही चिखली, निमसाखर व निरवांगीच्या ओढ्यावरील पुलावर पाणी आले.
गेली काही दिवसांपासून नीरा खोऱ्यात पाऊस ढगफुटीप्रमाणे कोसळत आहे. भाटघर धरण साखळीत होत असलेल्या पावसामुळे भाटघर, गुंजवणी, नीरा देवघर व वीर धरण ही चारही धरणे भरून वाहू लागले आहे. याप्रमाणे रविवारी (दि. 4) दुपारी मोठ्या प्रमाणावर नीरा नदीत जलसंपदा विभागाने मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले. यामुळे इंदापूर तालुक्यात बारामती – कळंब – निरवांगी – खोरोची पुढे सराटी हा रस्ता नीरा नदी समांतर आहे. यामुळे या सोडलेल्या पाण्यामुळे ठिकठिकाणच्या रस्त्यांवरील ओढ्याच्या पुलावर पाणी आले. यामुळे या रस्त्याच्या वापर करून जाणारे येणारे प्रवासी चारचाकी दुचाकीस्वार पाण्यात घालून जीव धोक्यात घालत आहेत. तर काही तरुण आपल्या दुचाकी स्वच्छ धुण्यासाठी ओढ्यावरील आलेल्या पाण्याचा वापर केला. दरम्यान नीरा नदीत पाणी मोठ्या प्रमाणावर सोडल्यामुळे वालचंदनगर पोलीस स्टेशनकडून हुल्लड बाजांना सज्जड दम देत पाण्यात वाहणे न घालण्याच्या सूचना केल्या. या पाण्यामुळे दुपारपर्यंत तरी कुठलेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. नीरा नदीकाठी पुराचे आलेले पाणी पाहण्यासाठी गर्दी होत असून नीरा नदीवरील पुलांवर होणाऱ्या गर्दीवर पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला. सध्या निमसाखर परिसरातील नीरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला असून सर्वसाधारण दिड फुटापर्यंत पाणी आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात होडी सोडू नये, यासाठी प्रशासनातर्फे यापूर्वीच सूचना देण्यात आली आहे.
काही रस्त्यांवरील वाहतूक बंद
नीरानदीमध्ये जलसंपदा विभागाने मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास कळंबोली (ता. माळशिरस) ते वालचंदनगर या मुख्य रस्त्यावरील पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली. खबदारीचे उपाय म्हणून वालचंदनगर पोलिसांनी काही काळ वाहतूक थांबवली होती.