कुशीनगर, (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या सरकारच्या काळात गुंडगिरीला आळा घातला जाऊ शाला नाही. मग या पक्षांकडून दहशतवादाला कसे रोखले जाऊ शकेल, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विचारला. जनता सक्षम आणि प्रामाणिक सरकारला मतदान करते आहे. त्यामुळे या निवडणूकीत विरोधकांचा सफाया होईल, असेही ते म्हणाले.
कॉंग्रेसकडून अल्वार सामूहिक बलात्कार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
बसपा नेत्या मायावती यांनी अल्वार येथील सामुहिक बलात्कार घटनेबाबत केलेल्या वक्तव्याचाही मोदी यांनी समाचार घेतला. मायावती या बलात्कार पीडीतेबाबत नक्राश्रू ढाळत आहेत. जर या बलात्कार पीडीत महिलेची काळजी असेल, तर राजस्थानात कॉंग्रेसचा पाठिंबा का काढून घेत नाही, असा प्रश्न मोदींनी विचारला. राजस्थानातील कॉंग्रेस सरकारनेही या दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. “हुआ तो हुआ’ असाच विचार कॉंग्रेस पक्षाकडून केला जात असेल, असे म्हणून मोदी यांनी सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्याचाही ओघाने समाचार घेतला. 1984 च्या शीखविरोधी दंगलीबाबत पित्रोदा यांनीही तसेच वक्तव्य केले होते.
अखिलेश यादव आणि मायावती यांच्या दोघांच्याही मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळापेक्षा अधिक काळ आपण गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेलो आहोत. पण या काळात आपल्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही, असेही पंतप्रधानांनी सुनावले.
जम्मू काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात झालेल्या चकमकीचा दाखला देऊन पंतप्रधानांनी जोरदार टीका केली. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांनी गोळीबार कसा केला, अशी टीका विरोधकांकडून व्हायला लागली होती. त्यावर दहशतवाद्यांवर गोळी चालवण्यापूर्वी जवानांनी निवडणूक आयोगाकडून परवानगी घ्यायची का? विरोधकांनी हा काय खेळ चालवला आहे, अशा शब्दात मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला.