वाठार स्टेशन (प्रतिनिधी) – राज्यात व देशात रिपाइंची भाजपबरोबर युती असताना माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्याकडून रिपाइंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नसल्याने माढा लोकसभा मतदारसंघात असलेल्या उत्तर कोरेगावमधील रिपाइं आठवले गटााकडून निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दोरके यांनी पत्रकाद्वारे दिली.
या पत्रकात म्हटले आहे की, माढा लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यापासून मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्याकडून उत्तर कोरेगाव विभागातील रिपाइं पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी कोणताही संपर्क ठेवण्यात आलेला नाही, प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभा, कोपरा सभा,
रॅली इत्यादी निवडणुकीच्या कोणत्याही यंत्रणेमध्ये आम्हाला सामावून घेतले जात नाही. रिपब्लिकन पक्षातील नेत्यांना जिल्हा पातळीवरील कोणत्याही कमिट्यामध्ये स्थान देण्यात आले नाही. मात्र असे असताना सुद्धा राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महायुतीचे काम करण्याचा निर्णय घेतला.
मात्र आम्ही नक्की कोणत्या प्रकारे काम करावे हा मोठा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. आम्हा कार्यकर्त्यांना भाजपा पदाधिकार्यांकडून कायम दुय्यम वागणूक देत असल्याने जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्या आदेशानुसार भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये हेमंत दोरके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
हेमंत दोरके म्हणाले, सध्या रिपाइंला भाजपाकडून कोणतीही साथ मिळताना दिसत नाही, दुय्यम वागणुकीमुळे आमच्या पक्षावर अन्याय होत आहे आम्ही फक्त भाजपला मतदान करण्यासाठी व त्यांनाच निवडून देण्यासाठी युती करायची का? असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये झाला असल्याने पुढील निर्णय अशोकराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येईल.