P. Chidambaram On Narendra Modi | Lok Sabha Election 2024 – भारतीय जनता पक्ष हा आता राजकीय पक्ष राहिलेला नसून तो केवळ पंतप्रधान मोदींची पुजा करणारा एक पंथ बनला आहे अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केली आहे.
मोदींच्या दहा वर्षांच्या राजवटीत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भयंकर गळचेपी झाली असून या अधिकाराचा ऱ्हास झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे. देशात लोकशाही टिकवण्यासाठी यंदा सत्ता बदल करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा उल्लेख नसला तरी, इंडिया आघाडी सत्तेवर आल्यानंतर तो रद्द केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
चिदंबरम यांनी तमिळनाडूमधील सर्व 39 जागा आणि पाँडिचेरीमधील एक जागा जिथे निवडणूक पार पडली तिथे इंडिया आघाडी विजयी होईल असा विश्वासही चिदंबरम यांनी व्यक्त केला आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना ते म्हणालेकी, भाजपने १४ दिवसांत जाहीरनामा तयार केला ज्याचे शीर्षक मोदींची गॅरंटी असे देण्यात आले आहे. हा पक्ष आता मोदी पूजक पंथ बनला आहे असे ते म्हणाले.
या मोदी पूजक पंथाला बळ मिळाले तर देशात हुकुमशाही येईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. जर मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर ते घटना दुरुस्ती करू शकतात असा दावाही त्यांनी केला.
देशासमोरील सर्वात मोठे आव्हान बेरोजगारीचे आहे, काँग्रेसचा जाहीरनामा रोजगार निर्मिती आणि संपत्ती निर्माण करण्यावर भर देतो. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यावर संसदेच्या पहिल्या सत्रात सीएए रद्द केला जाईल,असे चिदंबरम यांनी सांगितले.