BJP leader Subramanian Swamy On Pm modi- भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी मोदी यांच्यावर टीका करणारी एक पोस्ट टाकली आहे. उद्या म्हणजे शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असताना ही पोस्ट आल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.
या पोस्टमध्ये सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की ९ वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने माझी याचिका स्विकारल्यानंतरही राम सेतूला राष्ट्रीय वारसा स्मारक घोषित करण्याची प्रक्रिया मोदी यांनी रोखली. त्यांनी असे का केले तर त्यांना श्रेय हिरावून घेण्याची सवय आहे. याच कारणामुळे राम मंदिरासाठी माझी एक रिट याचिका स्विकारली जाण्यास विलंब व्हावा याकरता मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला होता.
राम मंदिराच्या निर्मितीसाठी त्यांनी योगदान दिले हा दावा करण्यासाठी मोदी यांच्यात जर खरी रामभक्ती असेल तर त्यांनी या प्रकरणाच्या निकालास विलंब व्हावा असे प्रयत्न त्यांनी का केले? राम सेतूला राष्ट्रीय वारसा स्मारक घोषित करण्यात ते अडथळे का निर्माण करत आहेत अशी विचारणाही स्वामी यांनी केली.
यापूर्वीही १६ एप्रिल रोजी चीनच्या संबंधांतील सीमा वादावरून त्यांनी मोदी यांना लक्ष्य केले होते. मोदी चीनच्या बाबत सौम्य धोरण स्विकारत असून भारत मातेची फसवणूक करत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली होती. दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मोदी का देत नाहीत अशी विचारणही त्यांनी केली होती.