पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे महत्त्वाचे असले तरी, मराठीवर अतोनात प्रेम करणाऱ्यांनी तिचा आपल्या वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक व्यासपीठावरून अभिजात मानूनच अधिकाधिक केला पाहिजे, असे प्रतिपादन मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष आणि इतिहास तज्ज्ञ प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी केले.
सृष्टी संस्था आयोजित मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा : वास्तव की मृगजळ या डॉ. किरण ठाकूर लिखित माहिती पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ नुकताच झाला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, फर्गसन महाविद्यालयातील मराठी भाषेच्या विभागप्रमुख डॉ. रूपाली शिंदे, मीडिया नेक्स्टचे व्यवस्थापकीय संचालक अभय कुलकर्णी, युवा अभिनेत्री प्रमिती संगीता हरी नरके, सृष्टीचे संस्थापक प्रशांत कोठडिया आणि अध्यक्ष सचिन नाईक उपस्थित होते.
सध्याच्या राजकीय व्यवस्थेत राज्यातील आमदार, खासदार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे केंद्र सरकारपुढे अभिजात भाषेच्या दर्जाची मागणी करण्याची हिंमत दाखवेल अशी सुतराम शक्यता नाही. ग्रीक आणि रोमन भाषांना कोणत्याही प्रकारच्या राजमान्यतेशिवाय तेथील सर्वसामान्य जनतेने प्रमाण भाषा बनवली आणि त्याचा व्यापक स्तरावर वापर केल्यामुळेच अभिजात दर्जा प्राप्त झाला.
त्याप्रमाणेच आपण आपल्या मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढवून प्रत्येक मराठी व्यक्तीने त्याचे रूपांतर लोकमान्यतेत केले पाहिजे, असेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले. डॉ. ठाकूर, डॉ. शिंदे, कुलकर्णी, नहार यांचीही भाषणे झाली. नाईक यांनी प्रास्ताविक केले, कोठडिया यांनी सूत्रसंचालन केले. शेखर केंदळे यांनी आभार मानले.