Kiran Samant। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या जागेचा तिढा महायुतीसाठी काही केल्या संपताना दिसत नाही. कारण या जागेवरून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात होते. मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी आपण माघार घेत असल्याचे म्हटले होते. असे असताना आता पुन्हा एकदा किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. त्यांची ही भेट रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी असल्याचे बोलले जातंय. तशी इच्छापण सामंत यांनी व्यक्त केलीय.
किरण सामंत नेमकं काय म्हणाले ? Kiran Samant।
“उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक पार पडली. त्या बैठकीत विदर्भातल्या काही जागांवर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाविषयीही चर्चा झाली. यावेळी भाजपाने देशात ४०० पारचा नारा दिला आहे. महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा हे करायचं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचाच मतदार असला पाहिजे हे मत घेऊन मी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो.”असे त्यांनी म्हटले.
इच्छुक असणं वाईट नाही, पण…Kiran Samant।
“देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मला आदर आहे, ते जो निर्णय देतील तो मला मान्य असेल. इच्छुक उमेदवाराने इच्छा व्यक्त करणं हे काही गैर नाही. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मी पाच वर्षांपासून तिथे काम करतो आहे. नारायण राणेंनी स्वतःहून उमेदवारी नाकारली होती. आता ते इच्छुक आहेत. इच्छुक असणं वाईट नाही. पण मी देखील त्या जागेचा प्रबळ दावेदार आहे. नारायण राणेंनी मला काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठीच आशीर्वाद दिला होता.” असंही सामंत यांनी म्हटलं आहे.
पुढे कमळ चिन्हावर लढवणार का हे विचारलं असता किरण सामंत म्हणाले, “मी कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार नाही. कोकणात कमळ चिन्हापेक्षा धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणं संयुक्तिक आहे. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचं आहे. मी आज देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलो आहे. देवेंद्र फडणवीस जो निर्णय देतील तो मला मान्य असेल.” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.