पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उन्हाचा वाढता चटका आणि उकाड्यामध्ये प्रवाशांना एसी बसचाच प्रवास सुखकर वाटत आहे. त्यामुळेच बसस्टाॅपवर साधी बस आली तरी त्याएवजी एसी बसमध्ये प्रवास करण्यावर प्रवाशांचा भर आहे. एसी बसमध्ये गर्दी असली तरी उभे राहून जावू पण एसीमधूनच जावू, अशा विचारातून साध्या बस मात्र बऱ्यापैकी रिकाम्या धावताना दिसत आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात १ हजार ७०० बसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा देत आहे. यामध्ये मागील काही वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात ई-बस दाखल झाल्या आहेत. या सर्व ई-बस एसी तसेच प्रशस्त आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून या बसला अधिक पसंती मिळत आहे. सध्या, या बस लांब पल्याच्या आणि काही प्रमुख मार्गावर धावत आहेत.
मागील महिन्याभरापासून शहरात उन्हाचा पारा ४२ अंशावर जावून पोहचला आहे. त्यामुळे अंगाची लहालाही होत आहे. उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत, अशा उकाड्यात पीएमपीने जायचे म्हटले तरी नको, ऊन खाली झाल्यावरच जावू, अशी प्रतिक्रिया येते.
मात्र, पीएमपीच्या ताफ्यात एसी बस आल्यापासून क्षणभर ऊन्हाचा चटका सहन करू आणि तासभर एसी बस प्रवासाचा आनंद घेऊ या विचाराने प्रवासी साध्या बसएवजी एसी बसची वाट पाहतात. यामुळे सध्या एसी बस गर्दीने भरून धावत आहेत. एसी असल्याने प्रवास मात्र आरामदायी होत असल्याने प्रवाशांचे म्हणणे आहे.
पीएमपीच्या ताफ्यात १७७ बस कधी येणार…
पीएमपीच्या ताफ्यात ४७३ ई-बस (एसी) आहेत. या सर्व बस भाडेतत्वावर चालविल्या जातात. तर आणखी १७७ बस येणे बाकी आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या कमी होत आहे. तर ई-बसच्या ताफ्यातील काही बस या दुरूस्तीसाठी डेपोत उभ्या असतात. त्यामुळे प्रवाशांना एन उन्हाळ्यात बससाठी बराचवेळ वाट पहावी लागते, अशा स्थितीत मागील अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या १७७ बस पुणे पीएमपीला मिळाल्या तर प्रवाशांची होणारी गैरसोय टळेल.