नरेंद्र मोदी यांनी भूतानला भेट दिली. चीन भूतानशी सीमा करार करण्याचा आणि आर्थिक मदतीतून भूतानला भारतापासून तोडण्याचा प्रयत्न करीत असताना मोदी यांचा हा दौरा भारत आणि भूतानसाठीही उपयुक्त ठरला आहे.
भूतानच्या दोन दिवसांच्या दौर्याहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भारतात परतले आहेत; मात्र यादरम्यान भूतानच्या पंतप्रधानांचे एक वक्तव्य आणि भूतानच्या राजाने उचललेले एक पाऊल चर्चेत राहिले आहे. मोदी यांना मिळालेला भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान आणि भारत आणि भूतानमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण करारांवरही चर्चा झाली. मोदी यांचा भूतान दौरा अशा वेळी झाला आहे, जेव्हा देशात लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. विकासाच्या मार्गावर भारत भूतानच्या पाठीशी उभा राहील आणि पुढील पाच वर्षांसाठी भूतानला दहा हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करेल, अशी ग्वाही मोदी यांनी आपल्या भेटीदरम्यान दिली.
एका महिन्यात मोदी आणि भूतानच्या पंतप्रधानांची ही दुसरी भेट आहे. 14 मार्च रोजी भूतानच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पाच दिवसांच्या दौर्यात पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. येथून परतल्यानंतर, त्यांनी मोदी यांचे आदरातिथ्य केल्याबद्दल आभार मानले आणि लिहिले, की आशा आहे की आम्ही लवकरच पुन्हा भेटू, या वेळी भूतानमध्ये. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. मोदी यांच्या भूतानच्या दौर्याच्या पहिल्या दिवशी राजधानी थिम्पू येथे एका समारंभात, भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी मोदी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ प्रदान केला.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भूतानकडून या सन्मानाने सन्मानित होणारे मोदी हे पहिले विदेशी नेते आहेत. भूतानच्या राजाने डिसेंबर 2021 मध्ये याची घोषणा केली होती. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा सन्मान भूतान आणि भारत यांच्यातील दृढ होत असलेल्या संबंधांचे प्रतीक आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक महासत्ता म्हणून भारताच्या उदयाचाही तो सन्मान करतो. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे स्वत: पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोदी यांच्या स्वागतासाठी हजर होते. दोन दिवसांचा दौरा संपल्यानंतर परतीच्या वेळी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक आणि पंतप्रधान दोघेही विमानात पंतप्रधान मोदी यांना भेटायला आले.
शिष्टाचार बाजूला ठेवून भेटीत आलेला औपचारिकपणा फार महत्त्वाचा आहे. शेरिंग तोबगे यांनी ‘सोशल मीडिया’वर या काळातील छायाचित्रे पोस्ट करून लिहिले, की मोदी यांना भूतानमध्ये येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्हाला भेटायला आल्याबद्दल माझे भाऊ मोदी यांचे आभार. त्यांचे व्यस्त वेळापत्रक किंवा खराब हवामान त्यांनी आम्हाला दिलेले वचन पूर्ण करण्यापासून रोखू शकले नाही. कदाचित यालाच मोदी यांची हमी म्हणतात.
मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी कटिबद्ध आहे, या अर्थाने भाजप निवडणुकीदरम्यान ‘मोदीच्या हमी’चा प्रचार करत आहे. भाजप आगामी लोकसभा निवडणूक केवळ मोदींचा चेहरा घेऊन लढत आहे. 21 आणि 22 मार्चला मोदी यांचा भूतान दौरा होणार होता; मात्र या दौर्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने दौरा पुढे ढकलण्याबाबत सांगितले आणि खराब हवामानामुळे दौरा पुढे ढकलण्याचे जाहीर केले. बिहार, पश्चिम बंगाल आणि हिमालयीन प्रदेश आणि अस्पाल भागात जोरदार पाऊस झाला. मंत्रालयाने सांगितले, की खराब हवामानामुळे पंतप्रधानांचा दौरा लांबणीवर टाकून नवीन तारखा जाहीर केल्या जातील. यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली; परंतु मोदी एक दिवसानंतर भूतानला रवाना झाले होते.
मोदी यांनी आपल्या भूतान दौर्याची माहिती अनेक ट्विटमध्ये दिली आहे. त्यांनी लिहिले, की मी दिल्लीला जात असताना, भूतानचे राजे महामहिम जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक मला विमानतळावर निरोप देण्यासाठी आले होते, त्यांच्या या विशेष आदरातिथ्यबद्दल मला सन्मानित वाटते. भूतानची ही भेट खूप खास होती, महामहिम राजा यांच्याशिवाय मी पंतप्रधान तोबगे आणि इतर मान्यवरांना भेटलो. आमच्यातील चर्चेमुळे भारत आणि भूतानमधील संबंध आणखी दृढ होतील. भूतानने सर्वोच्च नागरी सन्मान बहाल केल्याबद्दल त्यांनी भूतानचे आभार मानले आणि लिहिले, प्रेम आणि आदरातिथ्यासाठी भूतानच्या अद्भुत लोकांचे आभार. भारत नेहमीच भूतानचा विश्वासू मित्र आणि सहयोगी राहील.
मोदी यांच्या या दौर्यात भारत आणि भूतानमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये ऊर्जेसंदर्भात महत्त्वपूर्ण करार झाला आहे. भारत भूतानला पेट्रोलियम उत्पादने आणि वंगण पुरवठा करणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भूतानचे नियामक, तसेच भूतान अन्न आणि औषध प्राधिकरण यांना मान्यता देईल. दोन्ही देश क्रीडा आणि युवकांच्या बाबतीत भागीदारी करतील. भूतान आणि भारत यांच्यात अंतराळ प्रकरणांमध्ये संयुक्त कृती योजना तयार करण्यात आली. भूतान आणि भारत यांच्यात रेल्वे संपर्क प्रस्थापित करण्यासाठी दोघेही काम करतील. मोदी यांनी ग्याल्टसन जेटसन पेमा मदर-चाइल्ड हॉस्पिटलचे उद्घाटन केले. हे रुग्णालय पूर्णपणे भारताच्या मदतीने बांधण्यात आले आहे. जलविद्युत प्रकल्प, हरित ऊर्जा आणि सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये सहकार्याबाबत दोघांमध्ये करार झाला आहे. याचा फायदा भूतानच्या तिजोरीला होईल, अशी अपेक्षा आहे.
भूतानच्या सामाजिक-आर्थिक विकासात जलविद्युत प्रकल्पाला महत्त्वाचे स्थान आहे. भूतान वीज निर्मिती करतो आणि ती भारताला विकतो. त्यातून त्याला उत्पन्न मिळते. हा त्याच्या कमाईचा मोठा भाग आहे. भूतान सरकारच्या 2022 च्या आकडेवारीनुसार, भारत भूतानकडून 2,448 कोटी रुपयांची वीज खरेदी करतो. भारत आणि भूतान सरकारच्या सहकार्याने वांगडू फोड्रंग येथे बांधण्यात आलेला पुनतसांगछू-2 जलविद्युत प्रकल्प या वर्षी पूर्ण होईल, असा विश्वास आहे. एका अंदाजानुसार, या प्रकल्पातून वर्षाला 4,357 युनिट वीज निर्मिती होऊ शकते. भूतानच्या विकासात भारताचे सहकार्य 1960 च्या दशकात सुरू झाले. भारताने भूतानच्या 12 व्या पंचवार्षिक योजनेसाठी पाच हजार कोटी रुपयांचे वचन दिले आहे. सहाशेहून अधिक प्रकल्प राबविण्यास मदत केली आहे. या वर्षी लागू करण्यात आलेल्या 13व्या योजनेसाठी मदत आणखी वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.
भारताने आतापर्यंत भूतानमध्ये चार मोठे जलविद्युत प्रकल्प बांधले असून जलविद्युत सहकार्य हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आणखी दोन बांधकामे सुरू आहेत. भारत हा भूतानचा अव्वल व्यापारी भागीदार आणि गुंतवणुकीचा मुख्य स्रोत आहे, ज्याचा वाटा थेट परकीय गुंतवणुकीच्या पन्नास टक्के आहे. स्पेस, फिनटेक आणि ई-लर्निंग यांसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे. म्हणूनच भूतानच्या सत्ताधीशांना या नव्या कराराबद्दल मोदींची हमी वाटते. त्यांनी तशी प्रांजळपणे जाहीर कबुली दिली आहे.