लखनौ – उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार केवळ विवाहालाच नाही तर लिव्ह इन रिलेशनशीपलाही धर्मांतराचा कायदा लागू होतो असे न्यायालयाने ठोसपणे नमूद केले आहे. धर्मांतराचा कायदा हा केवळ विवाहापुरताच मर्यादीत ठेवला जाईल असे आतापर्यंत मानले जात होते.
मात्र न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे आता चित्र पूर्ण बदलले असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्य समाजात लग्न करणाऱ्या एका जोडप्याने सुरक्षेसाठी न्यायालयाचे दार ठोठावले होते. मात्र न्यायालयाने त्यांना संरक्षण प्रदान करण्यास नकार दिला.
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या या जोडप्यांवरही धर्मांतराचा कायदा लागू होतो अशी भूमिका न्यायालयाने घेतली. या जोडप्याला त्यांच्या कुटुंबाकडून कोणताही धोका नाही. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असेही न्यायालयाने नमूद केले.