कलेढोण – कलेढोण (ता. खटाव) येथे ग्रामपंचायतीचे आणि खासगी जलस्रोत पूर्ण आटल्याने तीव्र पाणीटंचाई ( water shortage) झाली आहे. ‘जलजीवन मिशन’चे पूर्णत्वास आलेले काम, विरोधकांनी बंद पाडल्याचा आरोप होत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे.
कलेढोणमध्ये ग्रामपंचायतीच्या आणि खासगी विंधन विहिरी आणि बोअरवेल महिन्याभरापूर्वीच पूर्णपणे आटल्याने गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. कलेढोणची लोकसंख्या जवळपास दहा हजार असून गावात मराठी शाळा व हायस्कूल आहे. तेथेही पाणी नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. गावातील कुटीर रुग्णालयातदेखील पाणी उपलब्ध नसल्याने गरोदर महिलांची प्रसूती करणे अशक्य झाले आहे.
ग्रामस्थांना आजूबाजूच्या गावांमधून पैसे देऊन टँकरने पाणी आणावे लागत आहे. मात्र, हा खर्च गोरगरीब ग्रामस्थांना परवडत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाकडे टँकरची (water tanker) मागणी वारंवार केली आहे; परंतु प्रशासनाने टँकर सुरू करण्यासाठी ठोस पावले उचललेली नाहीत.
पाणीटंचाईला कंटाळून महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला होता. त्यातच शासनाच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे पूर्णत्वास आलेले काम, विरोधकांनी तक्रारी केल्याने बंद पडले आहे, अन्यथा गावात पाणीटंचाई निर्माण झालीच नसती, असे सरपंच प्रीती शेटे यांचे म्हणणे आहे.