J. P. Nadda – लोकसभा निवडणुकीच्या संघटनात्मक तयारीसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुंबई निवडणूक संचालन समितीची बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि प्रचाराची तयारी यांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे सल्ले देखील दिले.
फार मोठ्या आणि महागड्या वाहनांनी प्रवास करू नका. तसेच विरोधक करत असलेली प्रत्येक चूक निवडणूक आयोगाकडे तक्रार म्हणून दाखल करत रहा, असा सल्ला त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
अबकी बार ४०० पार अशी घोषणा देत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील महत्त्वाचा वाटा असणार आहे.
महाराष्ट्रामध्ये ४२ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष भाजपच्या वतीने निर्धारित करण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबई परिसरात असणारे लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचे राहणार आहेत.
या सर्व मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित व्हावा, यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी स्वतः दंड थोपटले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. या दरम्यान त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अनेक महत्त्वाचे सल्ले वजा सूचना केल्या आहेत.
नड्डांच्या महत्वाच्या सुचना –
१. लोकांशी जोडण्यासाठी जसा देश तसा वेष या सूत्राचा वापर करा.
२. सरकारच्या कामाची कमी शब्दांमध्ये माहिती जनतेला करून द्या.
३. नवीन मतदारांशी संपर्क साधा.
४. लोकांशी संपर्क साधण्यासाठी लोकांमधीलच एखाद्या व्यक्तीची निवड करा.
५. विविध पक्षाच्या प्रत्येक चुकीची तक्रार निवडणूक आयोगाकडे करत रहा.
६. जास्त मोठ्या आणि महागड्या गाड्यांमध्ये फिरू नका.
७. राज्यातील सामाजिक आणि प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात रहा.