कोयनानगर, (वार्ताहर) – राज्यात सगळीकडे उन्हाळा सुरू झाला असून, पिकांना फटका बसत आहे. कृष्णा नदीचे पात्र ठिकठिकाणी कोरडे असल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे धरणाच्या पूर्वेकडील शेतकरी हवालदिल झाला आहे.
पिके करपून जाऊ नयेत यासाठी त्यांनी पूर्वेकडील सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्याची मागणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार धरणाच्या पायथा वीजगृहाबरोबर विमोचक दरवाजा उघडून कोयना नदीत 2600 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
सांगली, जत, आटपाडी, खानापूर, विटा येथे शेतीला पाणी मिळत नसल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी तेथील शेतकर्यांनी ना. शंभूराज देसाई यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार पूर्वेकडील शेतीसाठी कोयना धरणाची पायथा वीजगृहे आणि विमोचक दरवाजा उघडून 2600 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
सुहास बाबर यांचा पुढाकार
विटा-खानापूर-आटपाडीचे दिवंगत नेते अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांनी कोयनेच्या पाण्यासाठी पुढाकार घेऊन, धरणाच्या पूर्वेकडील सिंचन प्रकल्पांसाठी वाढीव पाणी सोडण्याची मागणी ना. देसाई यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.