नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेने 31 जानेवारी रोजी पेटीएम पेमेंट बँकेवर तडका फडकी कारवाई करून या या बँकेच्या कामकाजावर निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे पेटीएम पेमेंट बँकेच्या पालक कंपनीचा शेअर कोसळला आहे. या क्षेत्रात उलट सुलट चर्चा चालू झाली आहे. या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा फेरविचार करणार का असे पत्रकारांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना विचारले असता दास यांनी रिझर्व्ह बँकेला या कारवाईवर फेरविचार करण्याची कसलीही गरज वाटत नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे.
दास यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक एखाद्या संस्थेवर जेव्हा कारवाई करत असते, त्या अगोदर सर्व बाबीचा सर्वसमावेशक विचार केलेला असतो. यावेळीही आम्ही पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय बदलण्याची गरज आम्हाला वाटत नाही.
दास म्हणाले की, आम्ही प्रत्येक निर्णय गंभीरपणे घेत असतो. हा निर्णय अतिशय गंभीरपणे घेतलेला आहे. पेटीएम पेमेंट बँकेला 29 फेब्रुवारी नंतर ठेवी स्वीकारता येणार नाहीत. या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पेटीएम पेमेंट बँकेने रिझर्व्ह बँकेच्या अनेक नियमांचा भंग केला आहे.
या संदर्भात सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्यामुळे इतर फिनटेक कंपन्यावर परिणाम होऊ नये यासाठी असा निर्णय घेण्याची गरज होती असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात अनेक महिन्यापासून किंबहुना अनेक वर्षापासून पेटीएम पेमेंट बँकेसोबत आमची चर्चा चालू होती असेही दास यांनी सांगितले.
फिनटेक क्षेत्राला पाठिंबा
भारतातील फिनटेक उद्योग वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारतात डिजिटल अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. या अनुषंगाने अनेक कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवस्था सुकर झाली आहे. त्यामुळे एक क्षेत्र विकसित व्हावे असेच रिझर्व्ह बँकेला ठामपणे वाटते. मात्र असे असतानाच सर्वच ग्राहकांच्या हित संबंधाचे रक्षण करणे आणि वित्तीय व्यवस्था स्थिर ठेवणे रिझर्व्ह बँकेला पहावे लागते. त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे. आगामी काळातही भारतात फिन टेक व्यवस्था विकसित होईल असे त्यांनी सांगितले.
ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देणार
पेटीएम पेमेंट बँकेवर कार्यवाही केल्यानंतर या बँकेचशी संबंधित कोट्यवधी ग्राहकावर काय परिणाम होईल यासंदर्भात सध्या उलट सुलट चर्चा चालू आहे. हे अॅप व्यापारी वापरतात, पेमेंटसाठी बरेच नागरिक या अॅपचा वापर करीत असतात. या कारवाईनंतर या कामकाजावर काय परिणाम होणार आहे, या संदर्भात चर्चा चालू आहे.
या सर्व प्रश्नांना उत्तरे देणार्या माहितीचे सादरीकरण रिझर्व्ह बँकेद्वारा या आठवड्यात जारी केले जाणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र यामुळे एकूणच फिनटेक उद्योगावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता त्यांनी नाकारली. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था आणि वित्तीय व्यवस्था मजबूत आहे आणि या घटनाक्रमाचा त्यावर कसलाही परिणाम होणार नाही.