नवी दिल्ली – पाकिस्तानच्या निवडणुकीत पीटीआय पक्षाचा पाठिंबा असलेल्या आणि पराभूत झालेल्या अनेक अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या निकालाला न्यायालयात आव्हान दिले आहे. विशेषतः प्रांतीय निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत अनेक याचिका न्यायालयांमध्ये दाखल केल्या आहेत.
निवडणुकांमध्ये पीटीआय समर्थित उमोदवार सर्वात जास्त विजयी झाले आहेत. मात्र गैरप्रकारांमुळे हे निकाल बदलण्यात आले असल्याचा आरोप पीटीआय पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.
निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यास उशीर झाला, तेंव्हाच या मतमोजणीमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप पक्षाच्यावतीने केला जाऊ लागला होता. निवडणूक निकालांना न्यायालयामध्ये आव्हान देणार् या उमेदवारांमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री परवेझ इलाही आणि त्यांची पत्नी कैसेरा, खैबर-पख्तुनख्वा (केपी) माजी अर्थमंत्री तैमूर झाग्रा आणि केपीचे माजी सभापती महमूद जान, इस्लामाबादेतील वकील शुएब शाहीन, पंजाबचे माजी आरोग्य मंत्री डॉ यास्मिन रशीद, तसेच यासारख्या उच्चभ्रू राजकारण्यांसह पीटीआय सरकारमध्ये युवा उपक्रमांचे प्रभारी उस्मान दार यांची आई रेहाना दार हे आहेत.
याशिवाय पीएमएल-एन पक्षाच्याही काही पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात निवडणूक निकालांना आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता या याचिकांबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे पाकिस्तानसह जगभरचे लक्ष लागले आहे.