Rajesh Khanna : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत खास मैत्री होती. मात्र त्यांच्या काही काळानंतर दुरावा आला होता. मात्र त्यांच्यातील हा दुरावा शेवटपर्यंत कमी होऊ शकला नाही. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला राजेश खन्ना आणि शत्रुघ्न यांच्यातील मैत्री कठीण टप्प्यातून गेली. एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी याबाबत खुलासा करत मनातील खंत व्यक्त केली.
राजकारणामुळे मतभेद झाल्याचे शत्रुघ्न यांनी एका मुलाखतीत सांगितले. ही दुर करण्याचा त्यांनी प्रयत्नही केला होता. मात्र तोपर्यंत फार उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले. 1992 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा समोरासमोर होते. या निवडणुकीत शत्रुघ्न हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत होते. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले खन्ना काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले होते.
त्याबाबत शत्रुघ्न म्हणाले की, ‘दिल्लीच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांविरुद्ध लढलो. पोटनिवडणुकीत मी त्यांच्याविरुद्ध लढलो तेव्हा राजेश खूप नाराज झाले होते. पण मी त्यांना सांगितले की मी तुमच्याविरुद्ध लढत नाही. कारण कोण कुठे लढणार हे राजकीय पक्ष ठरवतात. खरे सांगायचे तर मला हे नको होते, पण मी लालकृष्ण अडवाणीजींना नकार देऊ शकलो नाही. मी राजेशला हे समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते पटले नाही, आम्ही बराच वेळ बोललो नाही.”
पुढे ते म्हणाले, “राजेश खन्ना हे रुग्णालयात असताना मला त्यांची माफी मागायची होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे दु:खद निधन झाले. राजेशच्या मृत्यूपूर्वी मी एकदा त्याची माफी मागितली होती. पण आम्ही पूर्वीसारखे बोलू शकलो नाही. या एका घटनेने मी आपल्या आयुष्यात कधीही मित्रांविरुद्ध निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी माझी पहिली निवडणूक हरलो मी फक्त निवडणूक हरलो नाही, तर माझा एक मित्रही गमावला.”