Mithun Chakraborty : बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 73 वर्षीय मिथून चक्रवर्ती हे एका चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतल्यावर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र आता त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ते लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. मिथुन चक्रवर्ती हे केवळ रील लाईफमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही सुपरस्टार आहेत. मिथुनच्या दातृत्वाच्या कथा फार कमी लोकांना माहित असतील. आज आम्ही तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहोत जी तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मुलीला घेतले दत्तक
मिथुन चक्रवर्ती यांना मिमोह, नमोसी आणि उष्मे हे तीन मुलगे आणि दिशानी एक मुलगी आहे. तुम्हाला माहिती आहे का ‘दिशानी’ ही मिथुनची दत्तक मुलगी आहे. मिथुन एक बंगाली वर्तमानपत्र वाचत होते ज्यात त्याने वाचले की एका जोडप्याने एका लहान मुलीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडले आहे. ही बातमी वाचून मिथुनचे मन दु:खी झाले. त्यांनी या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
याबाबत मिथुनने पत्नी योगिता यांच्याशी चर्चा केली आणि अभिनेत्रीनेही पतीला पाठिंबा दिला. दोघांनी पेपर वर्क पूर्ण करून मुलगी दत्तक घेतली. अभिनेत्याने मुलीचे नाव दिशानी ठेवले आहे. दिशानी आल्यानंतर मिथुनचा संसार पूर्ण झाला.
‘दिशानी’चे करिअर
दिशानीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती देखील तिच्या वडिलांप्रमाणे अभिनयाच्या पंक्तीत आहे. दिशानीने न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून सिनेमाचे शिक्षण घेतले आहे. होली स्मॉक आणि अंडरपास या दोन लघुपटांमध्ये ती दिसली आहे. दिशानी सलमान खानची फॅन आहे. तिला त्याच्यासोबत काम करायचे आहे. तिचे सोशल मीडियावर देखील मोठे चाहते आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार
मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. ‘मृगया’ चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून भूमिका करून स्वत:चा चाहता वर्ग तयार केला आहे.
चक्रवर्ती यांनी 7 मार्च 2021 रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला आहे. पण अलिकडच्या काळात ते राजकीय व्यासपीठावरून दूर राहात आले आहेत.