श्रीगोंदा – राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी १९८२ साली स्थापन केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने उत्तम शैक्षणिक दर्जा राखून उत्कृष्ट निकालाची परंपरा व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नेत्रदीपक प्रगती केल्यामुळे महाविद्यालयास वेगवेगळ्या प्रकारचे सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. हा महाविद्यालयाचा बहुमान असल्याची माहिती छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राद्वारे महाविद्यालयास करिअर कट्टा २०२४ अंतर्गत सहा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयास महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक मिळाला. अहमदनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळालेला आहे. प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांना उत्कृष्ट प्राचार्य म्हणून राज्यात चौथा क्रमांक व नगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळालेला आहे. प्रा. विलास सुद्रिक यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअर संसदेस उत्कृष्ट करिअर संसद म्हणून जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे.
नागवडे म्हणाले की, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी हे मोठे परिश्रम घेऊन उत्तम प्राविण्य मिळवत आहेत. विद्यार्थ्यांच्या बौध्दीक विकासाबरोबरच शारीरिक विकासाला प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य विद्यार्थी आत्मसात करीत आहेत. परिणामी उच्चतम निकाल व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे महाविद्यालय नावावर रूपाला आले आहे.
प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या कल्पक व मौलिक व्यवस्थापनामुळे महाविद्यालयास ए प्लस दर्जा प्राप्त करता आला. विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एका वर्षात 57 विद्यार्थ्यांची पोलीस व सैन्य दलात, 19 विद्यार्थ्यांची नौदलात तर 51 विद्यार्थ्यांची बँकिंग क्षेत्रात निवड झाली आहे, ही बाब अत्यंत गौरवास्पद असून संस्थेच्या व तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे. श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलीटेक्निक व बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी पॉलिटेक्निक यांनीही यशस्वीरित्या उत्तुंग भरारी घेतली. या पॉलिटेक्निकमधील शेकडो विद्यार्थ्यांना नोकरीच्या व रोजगाराच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत.