वर्धा – वर्ध्यात एका महिलेकडून नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विहिरीला शेंदूर लावायला वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलले. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, मुलाचे नशीब बलवत्तर होते म्हणून तो वाचला. त्याने विहिरीतील दोरीचा आधार घेत आपला जीव वाचवला. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये त्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर परिसरात चिंतेचं वातावरण आहे.
वर्ध्यातील नालवाडी परिसरात शेजारी राहणाऱ्या महिलेने एका बारा वर्षीय बालकाला विहिरीत ढकलल्याची घटना घडली आहे. नालवाडीच्या नागसेन नगर येथे राहणाऱ्या शारदा राजू वरके हिने शेजारी खेळत असलेल्या बारा वर्षीय बालकाला बोलावून विहिरीजवळ नेले होते.
12 वर्षांच्या मुलाला तिने विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला शारदाने थेट विहिरीत ढकलले. त्यांतर तिने तेथून पळ काढला. मुलाचे नशीब बलवत्तर म्हणून वाचला. घरी पोहचल्यानंतर बालकाने आई वडिलांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. आईच्या तक्रारीवरून आरोपी शारदा वरकेवर खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय नरबळी अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शारदा हिचा शोध घेत आहेत.