मुंबई – राज्यात तलाठी भरती परीक्षेत घोटाळा झाला असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तरी देखील सरकारच्या वतीने ही भरती प्रक्रिया सुरु ठेवण्यात आल्याने युवक काँग्रेसच्या वतीने दादर रेल्वे स्थानक परिसरात रेलरोको करण्यात आला. या आंदोलनामुळे रेल्वेगाड्यांना उशीर होत असल्याने अखेर रेल्वे पोलिसांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तलाठी भरती परीक्षेच्या पेपरफुटीचे धडधडीत पुरावे असतानासुद्धा हे भ्रष्ट शिंदे-फडणवीस सरकार जर घोटाळेबाजांना पाठीशी घालून, कुठलीही एसआयटी चौकशी न करता भरती तशीच पुढे रेटत आहे. त्यामुळे यापुढे राज्यभरात जागोजागी आंदोलने करण्यात येणार असल्याचे युवक काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे लोकल रेल्वेच्या वाहतूकीवर चांगलाच परिणाम झाला. या मुळे लोकल रेल्वे गाड्या सुमारे ४० ते ४५ मिनिटे उशीराने धावत होत्या. त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला.
विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या काय?
-सदर कॉपी प्रकरणाच्या चौकशीसाठी समितिची स्थापना करावी.
-या चौकशीचा अहवाल किमान दहा ते पंधरा दिवसांमध्ये सादर करावा.
-कॉपी प्रकरणाची चौकशी सुरू असताना तलाठी भरती परीक्षा काही दिवसांसाठी स्थगित करावी.
-चौकशीचा अहवाल आल्यानंतर परीक्षा पुन्हा घ्यावी.