पाटणा – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा लवकरच बिहारमध्ये दाखल होणार आहे. त्या राज्यात यात्रेदरम्यान काही सभा होणार आहेत. त्यावेळी राहुल यांच्या समवेत मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेसची यात्रा २९ जानेवारीला बिहारमध्ये पोहोचेल. त्या राज्यातील ४ जिल्ह्यांमधून यात्रा ३ दिवस प्रवास करेल. त्यावेळी पूर्णिया आणि कटिहारमध्ये कॉंग्रेसच्या वतीन सभांचे आयोजन केले जाणार आहे. त्या सभांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण नितीश आणि लालूंना देण्यात आले आहे. नितीश यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.
इतर कुठल्या कारणास्तव उपस्थित राहणे शक्य न झाल्यास पक्षाचा (जेडीयू) ज्येष्ठ प्रतिनिधी पाठवण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. लालूंनीही कॉंग्रेसच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या यात्रेवेळी इंडिया आघाडीतील ऐक्याचे दर्शन घडण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेस, जेडीयू आणि राजद हे विरोधी पक्षांनी देश पातळीवर स्थापन केलेल्या आघाडीचे (इंडिया) घटक आहेत.