स्वराज्य शिक्षक संघटनेची मागणी
टाकळी हाजी : आंतर जिल्हा बदलीबाबत ग्राम विकास विभागाचा दि. 23 मे 2023 चा शासन निर्णय आहे. यामध्ये संवर्ग 1 हा दिव्यांग आणि आजारी शिक्षकांसाठी आहे. तर संवर्ग 2 पती-पत्नी एकत्रीकरणसाठी आहे, आणि एकल शिक्षकसाठी संवर्ग 3 आहे. रिक्त जागेपैकी जेवढे संवर्ग 1 आणि 2चे अर्ज येतात त्यांचे अगोदर बदल्या होतात आणि जागा उरल्या तरच संवर्ग 3चे बदल्या होतात. त्यामुळे 15 वर्ष होऊनही संवर्ग 3चे बदल्या होत नाहीत. त्यामुळे आंतर जिल्हा बदलीमध्ये संवर्ग 3 साठी 60 टक्के कोटा ठेवावा, अशी मागणी स्वराज्य शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष गजानन पांचाळ यांनी महाराष्ट्रभर एकाच दिवशी निवेदन देऊन केली आहे.
मागील बदल्यांच्या सहाव्या टप्प्यामध्ये झालेल्या बदल्या पाहिल्या असता जास्तीत जास्त बदल्या ह्या संवर्ग 1 आणि संवर्ग 2च्याच झाल्या आहेत, कारण संवर्ग 1 आणि 2च्या बदल्या संपल्यानंतर संवर्ग 3 चे बदल्यांना सुरुवात होते. तसेच संवर्ग 1मध्ये बोगसचे तक्रारी फार वाढल्या आहेत. त्यामुळे संवर्ग 3साठी जागाच उरत नाहीत. त्यामुळे आंतर जिल्हा बदलीमध्ये संवर्ग 3साठी स्वतंत्र कोटा असावा. संवर्ग एक 20 टक्के, संवर्ग दोन 20 टक्के आणि संवर्ग 3 साठी60 टक्के याप्रमाणे कोटा ठेवणे आणि संवर्ग 1 व 2 मधील उरलेल्या जागा ही संवर्ग 3 ला देण्यात याव्यात.
या मागणी बरोबरच आंतरजिल्हा बदलीमध्ये संवर्ग 1मधील बोगस कागदपत्रे सादर करून बदलीचा लाभ घेणार्यांवर कडक कार्यवाही करावी. यासाठी तपासणी कॅम्प लावून वैद्यकीय पडताळणी नंतरच बदलीचा लाभ देण्यात यावा, तद् नंतरच कार्यमुक्त करण्यात यावे. तसेच लातूर तसेच सर्व जिल्ह्याचे रोस्टरची पुन्हा तपासणी करण्यात यावी. ऑनलाइन बदल्या दरवर्षी चालु ठेवाव्यात. आंतर जिल्हा बदलीसाठी पात्र सेवेची अट पाच ऐवजी तीन वेर्ष करण्यात यावे.
सर्वच जिल्हयाचे रोस्टरमध्ये होत असलेल्या अनियमितता दूर करणे. कोट्यात रुजू झालेल्या शिक्षकांचे सुद्धा बदल्या करण्यात याव्यात. संस्थेमधील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषदला समायोजन करण्यात येऊ नये. कोणत्याही संवर्गातील शिक्षकांची एकदा आंतरजिल्हा बदली झाल्यास पुन्हा पाच वर्ष बदली करण्यात येऊ नये.
पवित्र पोर्टलने नियुक्त 6 ते 8साठी नियुक्त शिक्षकांची दुसर्या जिल्ह्यात सुद्धा त्याच पदावर बदली करण्यात यावी. वरील मागण्याची शासनाने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने सर्व जिल्हा अधिकारी कार्यालय येथे तसेच आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्य अध्यक्ष गजानन पांचाळ स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिलाआहे.