भोसे शाळा प्रकरणापासून पालकांचा आखडता हात; एसटी प्रशासनावर ताशेरे
मोना शहा
कोरेगाव – जगभरातल्या लोकांना कोकणाचा कायम हेवा राहिला आहे. त्यातून घाटावर असलेले लोक दूर काय राहतील… दरवर्षी हिवाळ्यामध्ये शालेय सहलींचा हंगाम सुरू होतो आणि प्रत्येक शाळा आपली सहल कोकणात नेण्याचाच विचार करते. यावर्षी कोरेगाव तालुक्यातून सर्रास शाळा, महाविद्यालय आणि खाजगी शिकवण्याच्या सहली कोकणातच गेल्या. मात्र दोनच दिवसांपूर्वी कोरेगाव आगाराच्या सहलीच्या बसला रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे अपघात झाल्यानंतर पालकांनी डोक्यावर हात मारून घेतला आहे. भोसे सहल प्रकरणानंतर कोकणात सहल नको रे बाबा… असे म्हणण्यास पालकांनी सुरुवात केली असून विद्यार्थ्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे कोरेगाव एस. टी. आगाराच्या कारभारावर पुन्हा एकदा ताशेरे ओढले गेले आहेत.
गेल्या महिन्याभरात अनेक सहली कोकणात गेल्या होत्या, त्यापैकी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या भोसे येथील न्यू इंग्लिश स्कूलची सहल देखील कोकण दर्शनाला गेली होती. त्यासाठी कोरेगाव एस. टी. आगाराची बस क्रमांक (एम एच- १४. बी. टी.-४६२४) ही नेण्यात आली होती. या बसला झालेला दुर्दैवी अपघात आणि त्यातून सुरू झालेली चर्चा यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या सहलीतील विद्यार्थ्यांना म्हसळा येथील शाळेत मुक्कामी सोडण्यात आले. त्यानंतर शिक्षक आणि एस. टी. बस चालक जेवणासाठी गेले.
तिथून परतल्यानंतर एस.टी. बसचा अपघात झाला आणि मोठे महाभारत घडले. स्थानिक नागरिक आक्रमक झाले आणि त्यातून अपघाताचा विषय पोलीस ठाण्यापर्यंत गेला. एस. टी. महामंडळाच्या बसला मोठे नुकसान झाल्याने तात्काळ श्रीवर्धन आगारातून पर्यायी बस आणि चालक देण्यात आला. या बसद्वारे विद्यार्थ्यांनी सहल पूर्ण केली आणि ते भोसे येथे सहीसलामत पोचले. तोपर्यंत अपघाताची माहिती भोसे गावातील घराघरात पोहोचली. रात्रभर पालकांच्या जीवात जीव नव्हता. सहल परतल्यानंतर संतप्त पालकांनी विशेष बैठक घेतली, त्यात शिक्षकांनी आपली बाजू मांडली. प्रत्यक्षदर्शी अपघातस्थळी कोणी स्थानिक नसल्याने या घटनेची सत्यता अद्याप कोणालाही पडताळता आली नाही.
भोसे अपघात प्रकरणानंतर पै-पाहुण्यांपर्यंत कोकण सहलीचा विषय पोहोचला आणि आता पालक आपल्या विद्यार्थ्यांना कोकणात पाठवण्यास ते देखील एस.टी. बसद्वारे पाठविण्यास नकार देत आहेत. ही चर्चा तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून कोकणात सहल म्हणले की पालक नकार घंटा वाजवत आहेत. अपघाताच्या गोष्टीकडे प्रशासनाने कानाडोळा केला गेला असून अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. एस.टी. अधिकारी आमचा काही संबंध नाही, असे एका बाजूला सांगत असले तरी शिक्षण विभागाने मात्र हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. सोमवारी या संदर्भात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
शाळा, महाविद्यालये जबाबदारी का झटकतात ?
आम्ही विद्यार्थी असताना शालेय सहलीला गेलेलो आहोत त्यावेळी पालकांकडून कोणत्याही प्रकारचे संमती पत्र घेतले जात नव्हते. सर्व काही विश्वासावर चालत होते. आता शाळा, महाविद्यालये सहलीला विद्यार्थ्यांना नेताना पालकांकडून संमती पत्रे घेत असून त्यामध्ये कोणताही घातपात अपघात झाल्यास सर्वस्वी आमची जबाबदारी राहील असे लिहून घेतले जात आहे. त्यामुळे सहलीवर जाणाऱ्या शिक्षकांचे चांगले फावत आहे. विद्यार्थी घेऊन तुम्ही जातात तर मग तुमची जबाबदारी काही नाही का ? तुम्ही का जबाबदारी झटकता ? असा सवाल करत भोसे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या अपघात प्रकरणाला देखील असाच विषय कारणीभूत आहे. या संदर्भात पालकांशी संवाद साधून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.