पालकमंत्री विखे यांचे अधिकाऱ्यांना आदेश
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतीक्षा संपणार
श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शहरातील शिवाजी महाराज चौकात बसवावा, ही समस्त श्रीरामपूरकरांची मागणी राजकीय ताणाताणीत ४० वर्षे प्रलंबित आहे. याबाबत नुकतीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व हिंदुत्ववादी नेते, कार्यकर्त्यांची श्रीरामपूर येथे बैठक पार पडली. यात विखे पाटील यांनी संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महावितरण व श्रीरामपूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पुतळा उभारणीसाठी लागणाऱ्या बाबींची पूर्तता करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिली.
पुतळ्याच्या मागणी पूर्णत्वास नेण्याचा विडा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उचलल्याने श्रीरामपूरकरांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा सरचिटणीस, विधानसभा प्रमुख नितीन दिनकर व तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी भेट घेत सविस्तर माहिती दिली होती. फडणवीस यांनी त्यांच्याकडील ४ ते ५ खात्यांची ना-हरकत तत्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. त्यानंतर विखे यांनी तत्काळ १ कोटी रुपये निधी दिला.
प्रशासकीय पातळीवरील ११ पैकी १० एनओसी पूर्ण झाल्या आहेत. तसेच काल झालेल्या हिंदुत्ववादी नेते, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ना.विखे पाटीस यांनी संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, महावितरण व श्रीरामपूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पुतळा उभारणीसाठी लागणाऱ्या बाबींची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवावा म्हणून ४० वर्षांपासून लढणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमी, सर्वसामान्य श्रीरामपूरकरांच्या लढ्याचे हे यश आहे.