छत्रपती संभाजीनगर – रविवारी पहाटे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील हातमोजे तयार करणाऱ्या एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वाळूज एमआयडीसी परिसरातील कारखान्यात पहाटे सव्वा दोन च्या सुमारास ही आग लागली.
अग्निशामक दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमाराला आम्हाला फोन आला, जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा संपूर्ण कारखाना आगीने पेटला होता. स्थानिकांनी आम्हाला कळवले की सहा जण आत अडकले आहेत. आमचे अधिकारी आत गेले आणि त्यांनी सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले.
कामगारांनी सांगितले की, कंपनी बंद होती, आग लागली तेव्हा आतील लोक झोपले होते. आग लागली तेव्हा आता एकूण १० ते १५ कामगार होते. त्यातील काही जणांनी बाहेर पडून आपली सुटका करून घेतली पण सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. आग विझवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.