Navjot Singh Sidhu – लोकसभा निवडणूक (lok sabha election) तोंडावर आली असून पंजाबमधील (Punjab) राजकीय वातावरणाचा पार आताच वर चढला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू ( Navjot Singh Sidhu ) यांनी जोरदार बॅटींग सुरू केली असून काल झालेल्या एका सभेत त्यांनी केवळ विरोधी पक्षांचीच नाही तर आपल्या पक्षाच्या नेत्यांचीही धुलाई सुरू केली आहे.
भारतीय जनता पार्टीला आटोक्यात आणण्यासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे. त्या आघाडीतील पक्षही सिध्दू यांच्या तडाख्यात आता सापडले असून पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पार्टीवरही त्यांनी चौफेर हल्ला केला. आम आदमी पार्टीने रविवारी बठिंडा जिल्ह्यात विकास क्रांती रॅलीचे आयोजन केले होते. आप हा देशपातळीवरील इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे.
पंजाबमधील सत्ता प्राप्तीनंतर लोकसभेच्या निवडणुकीतही या पक्षाला आपले पंजाबमधील स्थान दाखवून द्यायचे आहे. एकप्रकारे येथे जागावाटपात कॉंग्रेसला फारसे महत्व न देण्याच्या दिशेने आपची पाउले पडत आहेत. मात्र आपने जेथे रॅली घेतली त्या स्थळापासून केवळ ३१ किमी अंतरावरच काल सिध्दू यांनी सभा घेतली.
विशेष म्हणज सभेसाठी त्यांनी पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टर अमरिंदर सिंग यांच्या वडलोपार्जित गावाची निवड केली. अमरिंदर पराभवानंतर भारतीय जनता पार्टीत दाखल झाले आहेत. मात्र सिध्दू यांनी कालच्या सभेत अमरिंदर यांना तर लक्ष्य केलेच, सोबत त्यांच्याच पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्यावरही तोफ डागली.
कॉंग्रेसमधील सिध्दू- अमरिंदर वादामुळे विधानसभा निवडणुकीत सत्ता गमवावी लागू नये म्हणून कॉंग्रेसने अखेरच्या क्षणी अमरिंदर यांची मुख्यमंत्रिपदावरून उचबांगडी करून त्या जागी चन्नी यांना आणले होते. सिध्दूंना मुख्यमंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली. त्याची बोच त्यांना आजही आहे.
आम आदमी पक्षाचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेसही सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचे भासवण्यासाठी तेंव्हा चन्नी यांचे बकरीचे दूध काढतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्या अनुशंगाने सिध्दू यांनी चन्नी यांच्यावर निशाणा साधला. दूध देनेवाली बकरीओंका कितना प्रभाव पडा असा सवाल त्यांनी कालच्य सभेत विचारला.
तसेच अमरिंदर यांचा भूतकाळ गौरवशाली आहे. तो त्यांनी जपावा. त्यांनी असे काही काम करावे की इतिहासात त्यांच्या नावाची नोंद केली जाईल असे आपण अमरिंदर यांना म्हणायचो. तथापि, आज काय झाले आपण सगळे बघतच आहात असे सिध्दू म्हणाले. चन्नी यांनाही आपण म्हटले होते की तुमच्याकडे चारच महिने आहेत.
तुमचे सर्वस्व पणाला लावा. लोकांच्या मनात राहील असे काम करून दाखवा. मात्र बकऱ्यांचे दूध काढून पुनरूज्जीवन झाले का असा सवाल त्यांनी केला. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी पंजाबच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली का असा सवाल विचारतानाच पंजाब सरकारच्या कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले.