राजगुरूनगर – पावसाने गेल्या हंगामात पाठ फिरविल्याने तसेच कांद्याच्या काढणीवेळीच अवकाळीचा फटका बसल्याने कांदा आवक घटली आहे. शेतकर्यांचे प्रचंड नुकसान या बेमोसमी पावसाने झाले होते. केंद्राने यावर दिलासा देण्याऐवजी कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेऊन शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची प्रतिक्रिया शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
काही वर्षांपासून केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करीत आहे. मागे निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले, त्यानंतरही कांद्याच्या निर्यातीबाबत अनेक चुकीची धोरणे घेतली.
आता बंदीचे शस्त्र उपसून शेतकर्यांना संपविण्याचा घाट घातला आहे. कांद्याचे दर आता जरी वाढलेले दिसत असले, तरी सुरवातीला एक हजार रुपये दराने कांदा विक्री झालेला होता.
शासनाने दर वाढीसाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत, त्यामुळे आता मिळत असलेल्या भावातून मागे झालेला तोटा भरून निघत आहे. त्यात निर्यातबंदी करून पुन्हा शेतकरी वर्गाला आर्थिक संकटात लोटले असल्याची संतप्त प्रतिक्रिया कांदा उत्पादकांनी व्यक्त केली आहे.