नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी राज्यसभेत बोलताना विरोधकांच्या आणि विशेषत: कॉंग्रेसच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखजोखा त्यांनी मांडला. सरकारच्या योजना, धोरणांमुळे भारत सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनल्याचे त्यांनी म्हटले.
अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर राज्यसभेत चर्चा झाली. सरकार असमान विकासाला चालना देत आहे, असे टीकास्त्र विरोधकांनी सोडले. सरकारचा विकास रोजगारहीन असल्याचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी म्हटले. मागील सरकारच्या योजनांचे श्रेय मोदी सरकार लाटत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला.
संबंधित चर्चेला उत्तर देताना सीतारामन यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. मागील सरकारने केवळ नावांसाठी योजना आणल्या. त्यांची योग्य अंमलबजावणी न झाल्याने त्या सामान्य जनतेपर्यंत पोहचल्या नाहीत. त्याउलट, मोदी सरकारने नव्या योजना आणून त्यांची योग्य अंमलबजावणी केली. त्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनात मोठा बदल घडला,असा दावा त्यांनी केला.
मोदी सरकारच्या कार्यकाळात काम करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण वाढले. मुद्रा कर्ज योजनेसारख्या पाऊलांमुळे स्वयंरोजगारांची निर्मिती झाली. देशातील १३ कोटीहून अधिक जनता गरिबीतून मुक्त झाली. महागाई रोखण्यासाठी सरकार तत्परतेने पाऊले उचलत आहे. जगभरात गोंधळाची स्थिती असताना मोदी सरकारने योग्यरित्या अर्थव्यवस्था हाताळल्याचे अहवाल परदेशी संस्थांनी दिले, असे सीतारामन म्हणाल्या.