डर्बन – दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आलेला भारतीय संघ कागदावर भक्कम दिसत असला तरीही हा दौरा खडतर असेल. यात खेळाडूंची शारीरिक क्षमता किंवा कामगिरी यांपेक्षाही सकारात्मक मानसिकताच जास्त महत्वाची ठरेल, असे मत संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे.
आजवर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकदाही कोणतीही मालिका जिंकता आलेली नाही मात्र, खेळाडूंनी आपली जबाबदारी ओळखून त्यानूसार खेळ केला तर यावेळी आम्ही इतिहास घडवू, असा विश्वासही द्रविड यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय संघ संपूर्ण जगभरात विविध मैदानांवर खेळला आहे. गोल्या दोन मोसमांपासून कामगिरीही सातत्यपूर्ण होत आहे. मात्र, अन्य देशात खेळणे व दक्षिण आफ्रिकेत खेळणे यात मोठा फरक आहे. खासकरून सेंच्युरीयन व जोहान्सबर्ग येथे खेळणे खूपच कठीण जाते. येथील खेळपट्ट्या गोलंदाजांसाठी पुरक असतात. फलंदाजांनी अत्यंत जबाबदारीने व क्षमतेचा पूर्ण वापर करत खेळ करणे गरजेचे आहे. येथील वातावरणात सतत बदल होत असतात तसेच खेळपट्टीवर गवतही राखलेले असते.
आशियाई खेळपट्ट्यांपेक्षा ते जास्त आव्हानात्मक ठरते. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजांसह आपल्याही गोलंदाजांना मदत मिळेल परंतू खरी परिक्षा फलंदाजांचीच राहील. चेंडू स्विंग होतो, अनेकदा खालीही राहतो. टणक खेळपट्टी मिळत नाही. दुपारचे सत्र म्हणूनच महत्वाचे असते. पहिल्यांदा टी-२० व एकदिवसीय मालिका होत असून ते आमच्यासाठी कसोटी मालिकेचे महत्व पाहता जास्त पथ्यावर पडेल. पण भारतीय संघातील सर्व प्रमुख खेळाडूंनी जबाबदारीने खेळ केला व जिद्द व संयम राखला तर यंदा भारताला दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात पराभूत करण्याचा इतिहास घडवता येणार आहे, असेही द्रविड म्हणाले.
पहिला अर्धा तास महत्वाचा
मर्यादीत षटकांच्या सामन्यात रणनिती वेगळी असते. तसेच खेळपट्टी फार धोकादायकही नसते. मात्र, कसोटी सामन्यांसाठी तयार केली जाणारी खेळपट्टी पूर्णपणे भिन्न असेल. त्यामुळे जर पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली तर पहिला अर्धा तास गोलंदाजांना द्यायचा. नंतर खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी करणे जास्त सोपे ठरेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, लोकेश राहुल यांच्याकडून मला जास्त अपेक्षा आहेत, असेही द्रविड म्हणाले.